वार्ताहर /रेवोडा
समाज सेविका व नेरूल पंचायतीच्या माजी सरपंच, विद्यमान पंच सदस्य तसेच म्हापसा मासळी विक्रेता संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती शशिकला गोवेकर यांचा षष्ठीपूर्ती वाढदिवसानिमित्त कुंडई येथे श्री क्षेत्र तपोभूमी पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्याहस्ते सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र तपोभूमीच्या श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, साळगावचे आमदार केदार नाईक तसेच शशिकला गोवेकर यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक उपस्थित होते.
यावेळी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आशीर्वचनपर बोलताना म्हणाले, श्रीमती शशिकला गोवेकर यांचे सामाजिक कार्य मोलादिक आहे. त्या माणूसकीच्या नात्याने हे कार्य करीत आहेत. त्यांच्या हातून हे कार्य सदोदित घडो असे स्वामीजी म्हणाले. आम्ही सर्वांनी माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिले पाहिजे. पण ते सध्या राहून गेले आहे. धर्म पंथ या गोष्टी असल्या तरीही माणूस माणूसच राहिला पाहिजे. आपले जे सर्व नियम आहेत ते माणूसकी सांभाळण्यासाठी आहेत. माणूसकीच्या वर नियम नाहीत. आपण माणूसकीच्या नात्याने जगायचा प्रयत्न केला तर खरच ही श्रुष्टी सर्वांग सुंदर बनेल. असा विश्वास स्वामीजींनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शशिकला गोवेकर यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी अशी सदिच्छा व्यक्त केली. स्वामीजींच्याहस्ते षष्ठीपूर्ती वाढदिवसा निमित्त गोवेकर यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ व मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने तागडीत बसवून गोवेकर यांचा गौरव केला. काही दिवसांपूर्वी श्रीमती शशिकला गोवेकर यांनी केलेली समाजसेवा, पंचायत पातळईवरील राजकारण व खडतर परिस्थितीतून जगलेले जीवन याचा आढावा घेणार शोभा नाईक यांनी लिहिलेल्या ‘संघर्षकन्या’ या पुस्तकाचे प्रकाशन प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्याहस्ते करण्यात आले होते.