पेरणी केलेली संपूर्ण शेती पाण्याखाली : साडेचारशे शेतकऱयांच्या श्रमांवर पाणी
प्रतिनिधी /शिरोडा
तळपणे शिरोडा येथील शिद्दोटे खाजन शेतीच्या बांधाला मोठे भगदाड पडल्याने पेरणी केलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. शुक्रवारी सायंकाळी जुवारी नदीला आलेल्या भरतीच्यावेळी हा बांध फुटला. तळपणे भागातील अनेक शेतकऱयांनी सध्या या शेतीमध्ये पेरणी केली होती व काहीजणांचे पेरणीचे काम सुरु होते. संपूर्ण शेतीत खाडीचे खारे पाणी घुसल्याने यंदाच्या हंगामातील पिक धोक्यात आल्याची माहिती येथील शेतकऱयांनी दिली.
शिरोडा भागात सर्वाधिक भातशेतीची लागवड होणारी शिद्दोटे ही सर्वांत मोठी व सुपिक शेतजमिन आहे. शिद्दोटे खाजन शेतीमध्ये तळपणे, सक्रे, आक्सण, शिरवाडा, तारीवाडा, बाजार शिरोडा व आसपासच्या भागातील साधारण साडेचारशेहून अधिक शेतकरी भातशेतीची लागवड करतात. येथील बहुतेक शेतकऱयांनी मशागत करुन नुकतीच पेरणी केली होती. काही शेतकऱयांनी पेरणीचे काम हाती घेतले होते. मात्र शेतीच्या बंधाऱयाला भले मोठे भगदाड पडल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱयांचे श्रम व पैसा वाया गेला आहे. बंधाऱयाला साधारण 10 मिटर लांबीचे भगदाड पडल्याने ते बुजविणे शेतकऱयांच्या क्षमतेच्याबाहेर आहे. सतत कोसळणारा जोरदार पाऊस, पाण्याचा वाढता प्रवाह व शेतीपर्यंत साहित्य नेण्यासाठी असलेल्या पायवाटेवर चिखल माजल्याने बंधाऱयाचे काम हाती घेताना अनेक अडचणी येत असल्याचे मिलिंद मामलेकर या शेतकऱयाने सांगितले. तरीही काही शेतकऱयांकडून पाण्याला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
शिद्दोटे भागातील वेटल, भेळे, नायकातड या शेतीमध्ये कर्जत या सुधारीत बियांण्याचा वापर करुन पावसाळी व वायंगणी अशा दोन्ही हंगामात पिक घेतले जाते. लाखो चौरस मिटरमध्ये चारशेहून अधिक शेतकरी या ठिकाणी पिक घेत आहेत. गेल्या वायंगणी हंगामातही खाजनशेतीचा बांध फुटल्याने अशाचप्रकारे पूणे शेतीमध्ये खारे पाणी घुसून शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला होता. बांधाला पडणारी भगदाडे बुजविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून शेतकऱयांकडून मागणी केली जात आहे. त्यासाठी शिद्दोटे खाजन शेतकरी संघटनाही स्थापन करण्यात आली आहे. शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी शेतकऱयांच्या या समस्येकडे लक्ष घालण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते. सध्या ते जलसंवर्धन खात्याचे मंत्री आहेत. शेती बंधाऱयांची दुरुस्ती व बांधकाम त्यांच्याच खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी शेतकऱयांच्या या समस्येकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.