मध्यवर्ती म. ए. समितीचे आवाहन : काळादिन यशस्वी करण्याचा निर्धार
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांना अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आले. या घटनेला आज 66 वर्षे झाली तरी मराठी भाषिकांचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणून 1 नोव्हेंबर रोजी बेळगावसह खानापूर व निपाणी येथे निषेध व्यक्त करण्यात येतो. यादिवशी बेळगावमध्ये काळादिन पाळून सायकलफेरी काढण्यात येते. यावेळी मराठी भाषिकांनी आपली एकी दाखवून द्यावी, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले.
तालुका म. ए. समितीचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. रणजित चव्हाण–पाटील यांनी प्रास्ताविक करत काळादिन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. आबासाहेब दळवी यांनी मराठी शाळांची कमी होत असलेली संख्या, अंगणवाडी भरतीवेळी प्रथम भाषा कन्नड असणाऱ्यांना प्राधान्य याविरोधात आंदोलन करण्याची सूचना केली. मारुती परमेकर यांनी महाराष्ट्र सरकारशी पाठपुरावा करावा, असे सांगितले. समितीमध्ये सक्रिय असणाऱ्यांनाच मध्यवर्तीमध्ये स्थान देण्याची मागणी मुरलीधर पाटील यांनी केली.
खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी सायकल फेरीसोबत सीमाप्रश्नाच्या खटल्याची सदस्यांना माहिती दिली. काळ्यादिनी महाराष्ट्रातून कोणताही नेता अथवा व्यक्ती बोलवायची असेल तर त्याची माहिती मध्यवर्तीला द्यावी, त्यामुळे परवानगी घेताना तशी नोंद करणे गरजेचे आहे. तसेच तज्ञ व उच्चाधिकारी समितीची बैठक बोलवावी, यासाठी महाराष्ट्र सरकारला 17 पत्रे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर, बी. डी. मोहनगेकर, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. राजाभाऊ पाटील यांनी सूचना मांडल्या.
मध्यवर्तीसाठी घटक समितीकडे नावे द्यावीत
सीमाभागात मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली घटक समित्यांचे कार्य चालते. जे मराठी भाषिक मध्यवर्ती म. ए. समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे घटक समितीकडे द्यावीत. बेळगाव व खानापूरसाठी 20 तर निपाणी व बिदरसाठी 10 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.