पिंपरी / प्रतिनिधी :
भाजप वातावरण निर्माण करण्यात पटाईत आहे. चिंचवडमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचे सांगितले जाते. पण, कोणतीही सहानुभूती नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने मोठा भ्रष्टाचार केला. भाजपच्या स्थायी समिती सभापतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला, त्याला पैसे खाताना पकडले. जेल झाली. भाजपचे राष्ट्रीय पातळीपासून गावपातळीवरील नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. सत्तेची घमेंड आलेल्या लोकांना, खोके घेणाऱ्यांना महाविकास आघाडीची ताकद दाखवा, असे आवाहनही पटोले यांनी केले.
महाविकास आघाडीच्या वाल्हेकरवाडी येथील मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, महाराष्ट्रामुळे कोरोना देशात पसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत सांगतात. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे पाप भाजपने केले आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान, राज्याची बदनामी केली जात आहे. देशाची सार्वजनिक संपत्ती विकून देश चालविला जात आहे. कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकरी, छोटे व्यापारी यांना बरबाद करत आहेत. भाजप देश बरबाद करायला निघाला आहे.
अधिक वाचा : पोटनिवडणुकीत गद्दारांचा बदला घ्या
लोकशाहीत मतदार राजा असतो, मात्र, देशाचे पंतप्रधान स्वत:ला राजा समजत आहेत. लोकशाहीत अशी घमेंड चालत नाही. जनतेच्या मनाचे त्यांना ऐकायचे नसेल, तर जनताच त्यांना जागा दाखवून देईल. महाविकास आघाडी सक्षमपणे महाराष्ट्राला पुढे नेत होती. परंतु, विश्वासघात करुन खोक्मयांच्या जोरावर आणि दिल्लीत असलेल्या महाशक्तीच्या भरवशावर सरकार पाडले. महाशक्तीला लोकांची, महाविकास आघाडीची ताकद दाखविण्याची संधी आली आहे, असेही पटोले म्हणाले.