उचगाव /वार्ताहर
गाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, देणार नाही देणार नाही गाव आमचे देणार नाही, गावपण जपणार हद्दवाडीला विरोध करणार अशा घोषणा देत उचगाव ता.करवीर येथील हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने गुरूवार दिनांक १२ रोजी उचगाव कडकडीत बंद ठेवण्यात आला. सकाळपासूनच सर्व ग्रामस्थांनी व व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद ठेवली होती. मंगेश्वर मंदिर याठिकाणी सर्व ग्रामस्थ पदाधिकारी एकत्र जमून उचगाव फाटा पर्यंत घोषणा देत महापालिकेच्या व पालकमंत्री निषेधार्थ घोषनाबाजी करण्यात आली उचगाव बंदला अभूतपूर्व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवसभर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त एकही दुकान चालू नव्हते.
उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी बोलताना, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्द वाढीमध्ये १८ गावांचा समावेश करण्याचा विषय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला आहे परंतु हद्दवाडीमध्ये उचगावला समाविष्ट करू नये, स्वतंत्र अस्तित्व ठेवावे,प्रथम शहर उपनगरे यांचा विकास करा, कोल्हापूर खड्डेमुक्त करा,महापालिकेतील भ्रष्टाचार संपवा, आधीच महापालिका कुपोषित आहे आमचा समावेश करून नेमका काय विकास करणार असा सवाल केला दिपक रेडेकर, राजू यादव, किर्ती मसुटे आदींसह अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला.
उचगाव कधीही हद्दवाढीत समाविष्ट होऊ देणार नाही असा निश्चय हद्दवाढ विरोधी कृती समिती व ग्रामस्थांनी केला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी हद्दवाडी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, शामराव यादव, तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील, दिनकर पोवार, शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव उपस्थित होते.