सिद्धराम महास्वामींकडून श्रद्धांजली : सहवासातील आठवणींना दिला उजाळा
प्रतिनिधी/बेळगाव
श्री ज्ञानयोगी सिद्धेश्वर महास्वामी म्हणजे आपल्या राष्ट्राला लाभलेले श्रेष्ठ संत होते. ते विलक्षण ज्ञानी आणि तितकेच उत्कृष्ट प्रवचनकार होते. भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाबरोबरच शरण साहित्य, संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या. मुख्य म्हणजे त्यांचे आचार आणि विचार एकच होते.
डॉ. राधाप़ृष्णन्, गुरुदेव रानडे यांच्या मांदियाळीमधून सिद्धेश्वर महास्वामी यांना स्थान होते. त्यांच्या निधनाने एक श्रेष्ठ ज्ञानयोगींना आपण गमावलो आहे, अशा शब्दात डंबळ गदग येथील जगद्गुरू तोंटदाचार्य संस्थान मठाचे डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांनी सिद्धेश्वर महास्वामींना श्रद्धांजली अर्पण केली.
आपला आणि त्यांचा उत्तम संवाद होता, असे सांगून त्यांच्या सहवासातील आठवणींना सिद्धराम महास्वामींनी उजाळा दिला. त्यांच्यासारखी वात्सल्य मूर्ती लाभणे दुर्मीळ होय. जनमाणसात वावरणारे ते देवच होते. त्यांच्या निधनाने आपल्यासह जनसमूह शोकसागरात बुडाला आहे, असेही सिद्धराम महास्वामी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.