गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच विरोधी पक्षांची युती भक्कम होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात येत्या गुरुवारपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तुंबळ रण माजणार असे दिसत आहे. लोकसभेची निवडणूक 8-9 महिन्यांवर आलेली असताना एकीकडे विरोधक मजबूत होत आहेत तर दुसरीकडे मोदी आणि भाजप नवीन मित्रांच्या शोधात लागले आहेत.
या अधिवेशनात मुद्यांना तोटा नाही. सतराशे साठ मुद्दे आहेत. मणिपूर ते महाराष्ट्र असे मुद्दे आहेत. बहुतांशी सरकारला अडचणीत आणणारे आहेत. कर्नाटकमधील विजयाने विरोधी पक्षांत नवीन हुरूप आलेला आहे. संसद अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर बंगरुळूमध्ये 20 विरोधी पक्ष युतीवर खल करण्यासाठी भेटणार आहेत. तेव्हा सरकारला कसे शिंगावर घ्यायचे याबाबत रणनीती ठरणार. अशावेळी संसदेचे अधिवेशन वादळी ठरले तर नवल नाही. गेली दोन महिने भाजप शासित मणिपूर पेटलेले असूनही पंतप्रधानांनी अजून अवाक्षरदेखील न काढल्याने विरोधक क्षुब्ध आहेत. तेथील मुख्यमंत्री बीरेन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. अशात नवीन आलेल्या अमेरिकन राजदूतांनी मणिपूर प्रकरणी आपला देश भारताला मदत करायला तयार आहे असे सांगून नको तिथे नाक खुपसले आहे असे विरोधी पक्षांना वाटते. उत्तरेतील राज्यांसह बऱ्याच राज्यात पुराचे अफाट संकट उदभवले असताना केंद्र आणि राज्यांमधील उफाळलेला संघर्ष लोकसभा आणि राज्यसभेत दिसणार आहे.
राजधानी दिल्लीत न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा पूर यमुनेला आल्यामुळे केंद्र सरकार आणि आम आदमी पक्ष यांच्यात खडाजंगी अगोदरच सुरु झाली आहे. महागाईच्या भस्मासुराने घेतलेल्या पेटाने सामान्य माणूस हैराण झाला आहे. डाळी आणि भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव घसरले तरी देशात मात्र अजूनही चढ्या भावाने सुरु असलेल्या विक्रीमुळे सरकारवरील टीका वाढत आहे. अरविंद केजरीवाल यांचा सध्या एककलमी कार्यक्रम म्हणजे दिल्ली सरकारविरोधी काढलेल्या केंद्राचा अध्यादेश कसा रद्द करता येईल हा आहे. या अध्यादेशाविरुद्ध विरोधी पक्षांना एक करण्याची मोहीम त्यांनी सुरु केली आहे. काँग्रेसने त्यांना अजूनतरी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने ते खवळलेले आहेत. दुसरीकडे बंगालमधील पंचायत निवडणूकीत झालेल्या जबर हिंसाचाराने भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये वाग्युद्ध छेडले गेले आहे. भाजपचे ज्या भागात आमदार-खासदार आहेत तिथेच जास्त हिंसाचार झाल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटदेखील संसदेत गदारोळ माजवणार आहे. साक्षात शरदराव तसेच सुप्रिया सुळे याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारतील तर वावगे वाटायला नको. प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यासाठीदेखील काम सुरु आहे आणि अधिवेशनाच्या तोंडावर एक छोटा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. चार-पाच जेष्ठ मंत्र्यांनादेखील नारळ देऊन संघटनेत पाठवण्याचा विचार सुरु आहे.
भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष होऊनदेखील आपल्या लहानमोठ्या विरोधकांना तोडण्याचे का काम करत आहे? असा सवाल विचारला जात आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणात विधानसभा निवडणूक वर्षाअखेर होणार असल्याने या राज्यातील प्रतिस्पर्धी पक्ष अधिवेशनाचा वापर एकमेकांचे उणेदुणे काढून आपला प्रचार करण्यासाठी करतील. मध्यप्रदेशमधील एका आदिवासीवर लघुशंका करण्याचा जो किळसवाणा प्रकार झालेला आहे त्याचे पडसाद संसदेत उठणार आहेत. तामिळनाडूच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याविना राज्यातील एका वादग्रस्त मंत्र्याला बडतर्फ केले ते प्रकरण या अधिवेशनात गाजणार आहे. गैरभाजप राज्यात बरेच राज्यपाल आपली मनमानी करत असल्याने आणि केंद्र त्यांना संरक्षण देत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने त्याविरुद्ध आवाज उठवण्याकरता विरोधकांनी कंबर कसली आहे.
बालासोर येथील रेल्वे अपघातात जवळजवळ 300 लोक ठार झाल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे. त्याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत उठल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधानांनी एकीकडे नवनवीन वंदे भारत रेल्वे सुरु करण्याचा सपाट लावला आहे तर दुसरीकडे रेल्वे सुरक्षा आणि रेल्वेमधील स्वच्छता तसेच सुरक्षितता याकडे ध्यान नाही असे आरोप वाढत आहेत. गरीब वर्गाचे डबे आणि गाड्या कमी होत आहेत असे दावे आहेत. त्यांना स्पष्ट उत्तरे मिळालेली नाहीत. संजय कुमार मिश्रा या ईडीच्या प्रमुखांची मुदतवाढ रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ‘जोर का झटका’ दिला आहे. मोदी सरकार कथितपणे सुडाचे राजकारण कसे करत आहे हे सांगण्याची विरोधी पक्षांना त्यामुळे सुवर्णसंधी मिळणार आहे. ब्रिजभूषण शरण सिंग या वादग्रस्त भाजप खासदारावरूनदेखील संसदेत बरेच रण माजणार आहे. महिला पहिलवानांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाच्या केलेल्या आरोपांची कोर्टाने दखल घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे पण त्याला अजून अटक न झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. ब्रिजभूषण उलटला तर भाजपला उत्तरप्रदेशातील खासदारकीच्या चार जागा धोक्यात येतील म्हणून त्यावर कारवाई होत नाही असा विरोधकांचा आरोप आहे. या अधिवेशनात 21 नवीन विधेयके आणली जाणार आहेत आणि एकंदर 31 विधेयके पारित करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. समान नागरी कायद्याविषयी विधेयक सरकार आणणार काय याविषयी स्पष्टता नाही तरी या विषयावर संसदेत गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटक सरकारला अन्नभाग्य योजनेसाठी स्वस्त तांदूळ देण्याचा केंद्राने नकार देऊन अजून एक वाद निर्माण केलेला आहे. आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देशमबरोबर भाजप जाणार आहे असे दिसत असल्याने मुख्यमंत्री जगन मोहन रे•ाr यांचा पक्ष कशी भूमिका घेतो ते या अधिवेशनात दिसून येईल. रे•ाr यांच्या सरकारने केलेल्या बऱ्याच आर्थिक मागण्या केंद्राने एका झटक्यात संमती दिल्याने ते आक्रमक भूमिका घेणार नाहीत आणि सरकारला मदतच करतील अशी अपेक्षा भाजपकडून होत आहे.
तेलंगणात विधानसभा निवडणूक असल्याने मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती भाजपविरोधी आघाडी उघडू शकते. पंतप्रधानांच्या ‘ऐतिहासिक’ अमेरिका दौऱ्याचा संसदेला वृत्तांत सादर करत असताना सरकार आपलीच पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. मोदींचा सध्या सुरु असलेला फ्रान्सचा दौरा, त्यांनी इजिप्त आणि युनाइटेड अरब एमिरेट्सला दिलेली भेट याचा उल्लेख करत पंतप्रधान कसे विश्वगुरू झाले आहेत ते दाखवले जाईल. देशात जी-20 देशाच्या प्रमुखांची बैठक होणार असल्याने भारताची मान आंतरराष्ट्रीय जगतात कशी उंचावली गेली आहे याबाबत देखील सांगितले जाईल.
गेल्या महिन्यात विरोधकांच्या बहिष्काराला न जुमानता पंतप्रधानांनी वाजत गाजत नवीन संसद भवन इमारतीचे उदघाटन करून एका नव्या वादाला जन्म घातला होता. या नवीन संसद भवनाचे उदघाटन करण्याकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का बरे बाजूला ठेवले गेले हा मुद्दा विरोधक लावून धरणार आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे ऑगस्ट 11 पर्यंत चालणारे हे अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीतच होणार आहे. कितपत बरोबर अथवा चूक हे ज्याचे त्याने ठरवावे पण राहुल गांधी यांचे सदस्यत्व ज्याप्रकारे घालवले गेले त्याने आणीबाणीचा काळ वगळता विरोधकांना आजच्याइतके कधीच हैराण केले गेले नव्हते अशी सर्वदूर भावना वाढीस लागली आहे. विरोधक लढाईला सज्ज झाले आहेत.
सुनील गाताडे