राजकीय अस्थिरतेची हायकमांडकडून दखल : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सुरू असलेले अंतर्गत संकट पाहता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 6 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वयासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचाही समावेश आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, मंत्री विक्रमादित्य सिंग, ज्येष्ठ नेते कौल सिंह ठाकूर आणि धनीराम संदिल यांचा समावेश करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू आहे. काँग्रेसचे सहा आणि तीन अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत पक्षाविरोधात मतदान करणारे काँग्रेसचे सहा आमदार उत्तराखंडमधील एका हॉटेलमध्ये राहायला गेले आहेत. सुखविंदर सिंग सुक्खू यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार करत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून बळ मिळत असल्याचा दावा केला आहे.
राज्यात अजूनही अस्थिरता असून तीन अपक्ष आमदारांसह काँग्रेसच्या सहा अपात्र आमदारांना चंदीगडहून ऋषिकेशला हलवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी चंदीगडहून हे सर्व नेते, आमदार आणि बंडखोर नेते जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना ऋषिकेशला नेण्यात आले. हे सर्व नेते ऋषिकेशमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. माजी उद्योगमंत्री विक्रम सिंह ठाकूर आणि आमदार राकेश जामवाल हेदेखील त्यांच्यासोबत असल्याचे समजते. ऋषिकेशला पोहोचलेल्या आणि विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांमध्ये राजिंदर राणा, सुधीर शर्मा, इंदर दत्त लखनपाल, रवी ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो आणि चैतन्य शर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष आमदार कृष्णलाल ठाकूर, होशियार सिंह आणि आशिष शर्मा हेही त्यांच्यासोबत आहेत.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
काँग्रेसच्या या सहाही आमदारांना पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र ठरवण्यात आले असून, त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे. सध्या राज्यातील एकाही नेत्याने किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने येथे राहणाऱ्या आमदारांची भेट घेतली नाही. हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले होते. क्रॉस व्होट करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंग पठानिया यांनी अपात्र ठरवले आहे. ज्यावर काँग्रेसच्या आमदारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देण्याची शक्मयता आहे.