ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली. त्यानंतर राज्यभरातून अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन केले. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना फोन केला नव्हता. त्यामुळे अजित पवार हे पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या तसेच पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, मीडियाच्या प्रश्नानंतर अजित पवार यांनी यावर खुलासा केला.
अजित पवार म्हणाले, जयंत पाटील यांना एकटय़ालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही. यापूर्वी छगन भुजबळ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी कोणाला फोन केल्याचं किंवा कोणाविषयी कोणतंही वक्तव्य केल्याचं तुम्ही दाखवा. मीडिया जाणीवपूर्वक वेगळे अर्थ काढत आहे. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीला उत्तर देत नाही. फोन करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून चर्चा केली पाहिजे.
माझ्या बाबतीतही ईडीने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी काय बोलायचं ते मी बोललो. नंतर पुन्हा कामाला लागलो. भाजपमध्ये गेल्यांची चौकशी होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलवणं चुकीचं असल्याचेही अजित पवार म्हणाले.