बाळ्ळी येथील डॉ. सतीश फळदेसाई यांचे निधन झाल्यास आज बारा दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा.
अडणे, बाळ्ळी या दुर्गम भागातील सुसंस्कृत कुटुंबात 10 डिसेंबर, 1965 रोजी डॉ. सतीश फळदेसाई यांचा जन्म झाला. आई लीलाबाई कृष्णा फळदेसाई (प्राथमिक शिक्षिका) यांच्या संस्कारांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य तो आकार मिळत गेला. डॉ. फळदेसाई हे बालपणापासून एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले गेले होते. त्यांचे शिक्षण असोळणा येथील एम. पी. एस. हायस्कूलमध्ये झाले. शालान्त परीक्षेत त्यांनी बोर्डात क्रमांक मिळवून आपली शैक्षणिक विद्वत्ता सिद्ध केली होती.
त्यांनी पुढील शिक्षण मडगावच्या चौगुले कॉलेजमध्ये पूर्ण केले व पणजीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. नंतर मुंबईत त्यांनी दोन वर्षांत अन्य शिक्षण घेतले. त्यांच्या हुशारीची नेहमीच कदर करणाऱया भिकू देसाई यांनी त्यांना गोव्यात आणून रेड क्रॉस संस्थेत कार्यरत केले. तेथे दोन वर्षे सेवा दिल्यावर त्यांच्या डॉक्टरी पेशातील कार्याची दखल घेऊन त्यावेळी गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
त्यावेळी कुंकळ्ळी भागात एका चांगल्या डॉक्टरची गरज होती. हे ओळखून काही जाणकार व्यक्तींच्या सांगण्यावरून डॉ. सतीश यांनी स्वतःचा दवाखाना कुंकळ्ळी येथे सुरू केला. त्यांची जन्मभूमी बाळी असली, तरी कर्मभूमी कुंकळ्ळी राहिली. डॉ. सतीश यांच्या दवाखान्यात लोकांची नेहमी गर्दी असायची. पेशाने डॉक्टर असले, तरी ते लोकांशी प्रेमाने व साधेपणाने वागायचे. लोकांना त्यांचा हा सेवाभावी, प्रेमळ स्वभाव मनापासून आवडायचा.
डॉ. सतीश फळदेसाई यांचा तो हसरा चेहरा व मनाचा भोळेपणा लोक कधीच विसरू शकणार नाहीत. सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. मध्यंतरीच्या काळात 2000 साली सामाजिक बांधिलकी जपणाऱया कुंकळ्ळीतील काही सेवाभावी मित्रपरिवाराला सोबत घेऊन त्यांनी कुंकळळी अर्बन को-ऑपरेटिव्ह पेडिट सोसायटीची स्थापना केली. सर्व संचालकांनी डॉ. सतीश यांना एकमताने अध्यक्षपदी निवडून दिले. ‘अ’ दर्जा मिळालेल्या या सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांना शेवटपर्यंत ठेवण्यात आले. डॉ. सतीश यांच्या पत्नी तनुजा फळदेसाई या काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. मुलगा साईराज हा डॉक्टर, तर मुलगी ओजस्वी ही प्रगती पब्लिक स्कूल, द्वारका-दिल्ली येथे विज्ञान शाखेत बारावीला आहे.
सकारात्मक अनुभूती आणि नवनिर्माणाची स्वप्ने पाहण्याची दृष्टी लाभलेल्या डॉ. सतीश यांनी समाजातील गरजवंतांना योग्य ती मदत व मार्गदर्शन केले. तसेच अनेक संस्थांना व वेगवेगळय़ा सामाजिक उपक्रमांना देणग्या देण्याची दानत डॉ. सतीश यांच्याकडे होती. त्यांच्या समाजकार्याची व रुग्णसेवेची दखल घेऊन अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या प्रेरणेतून रोगनिदान आणि रोगचिकित्सा यामध्ये दुर्लभ यश प्राप्त केलेले डॉ. सतीश आज समाजासमोर आदर्श बनून राहिले आहेत. ‘वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल । चालता बोलता देव तुम्हाला नेईल ।। माणुसकी व स्नेह यांची ज्यावेळी चर्चा होईल । त्यावेळी सर्वांत पहिली आठवण तुमची येईल ।।
– संदीप नाईक गावकर