’कचरामुक्त किनारे’ लढय़ात सहभागी होण्याची घेतली शपथ
प्रतिनिधी/ पणजी
भावी पिढय़ांचा विचार करता समुद्र आणि किनारे संरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला समुद्र तसेच महासागरांच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ हे अभियान राबवण्यात आले, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्ले यांनी केले.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर सेवा पंधरवडा मोहिमेचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत काणकोणपासून पेडणेपर्यंत 37 समुद्रकिनाऱयांच्या स्वच्छतेचे काम आरंभ करण्यात आले.
‘स्वच्छ भारत, नितळ गोंय’, हम सब का एक ही नारा, स्वच्छ है देश हमारा,’ यासारख्या घोषणा देत प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधी, भाजप कार्यकर्ते आणि पालिकेच्या स्वच्छता कामगारांनी किनाऱयांवरील कचरा स्वच्छतेत सहभाग घेतला. त्यावेळी मानवी साखळी करून प्रत्येकाने ‘कचरामुक्त किनारे’ लढय़ात सहभागी होण्याची शपथ घेतली.
या मोहिमेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यातील प्रमुख कार्यक्रम मिरामार समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला. त्यात राज्यपाल पिल्लई यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, दिव्या राणे आदींचा सहभाग होता.
त्याशिवाय भूविज्ञान मंत्रालयातील विभाग, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारतीय तटरक्षक दल, 1 गोवा एनसीसी बटालियन, भारत पर्यटन आणि राज्य सरकारचे विविध विभाग, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला होता.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देशविदेशातील पर्यटकांना भूरळ घालणारे समुद्रकिनारे गोव्याला लाभले असून ही दैवी देणगी सांभाळून ठेवतानाच ते सदैव नितळ राहतील याचीही जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. किनारे स्वच्छ राहिले तरच पर्यटक येतील. त्यातूनच पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असल्याने स्वच्छतेची ही मोहीम 365 दिवस चालूच ठेवावी लागेल, असे ते म्हणाले.
‘ड्रग्जमुक्त गोवा’ बनविण्यासाठीही प्रत्येकाचे योगदान आवश्यक
किनारे स्वच्छ ठेवणे हे केवळ सरकारचेच काम असल्याच्या गैरसमजात न राहता प्रत्येकाने त्यात योगदान दिल्यास स्वच्छता कामगारांचे काम हलके होईल व किनारे आपोआप स्वच्छ होत राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी स्वच्छ किनाऱयांबरोबरच ‘ड्रग्जमुक्त गोवा’ बनविण्यासाठीही प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे. राज्यात कोणत्याही प्रकारे ड्रग्जला थारा मिळणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. सरकारी तपास यंत्रणा आपल्यापरीने काम करतच आहेत, परंतु ड्रग्ज व्यवहाराच्या समूळ उच्चाटनासाठी एक जागरूक नागरिक या नात्याने आपणही त्यांना मदत केली पाहिजे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
राजभवनवर गोशाळेचे उद्घाटन
याच उपक्रमाचा भाग म्हणून दोनापावल येथे राजभवन परिसरात गोशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्वेतकपिला या गोमंतकीय जातीच्या गाईचा येथे सांभाळ करण्यात येणार आहे. सुमारे 15 दिवस चालणाऱया या अभियानात समाजोपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, लसीकरण मोहीम, जलस्रोत स्वच्छता तसेच प्रत्येक राज्यातील कला व संस्कृतीची देवाण-घेवाण करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यभरात रस्ते आणि महामार्गांवर ठाण मांडून बसणाऱया भटक्या गुरांमुळे रहदारीत अडथळे येतात. त्यातून अनेक गंभीर अपघातही घडतात. राज्यात सध्या सात ठिकाणी गोशाळा आहेत. त्यात वाढ करून या गुरांच्या बंदोबस्तासाठी प्रत्येक तालुक्यात खास व्यवस्था करण्यात येणार आहे. या गुरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गोशाळा चालकांकडे देण्यात येईल, असे सांगितले.