केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या पाच वर्षांमध्ये देशभरात कोठेही पेट्रोल उपयोगात आणण्याची आवश्यकता भासणार नाही, असे महत्त्वाचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील जिल्हय़ात जैविक इंधनाची निर्मिती केली जात आहे. हे इंधन वाहनांमध्ये यशस्वीरित्या उपयोगात आणले जात असून त्याचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे हरित हायड्रोजनची निर्मितीही आता शक्य झालेली असून खोल विहिरींमधील पाण्यापासून हायड्रोजन इंधनाची निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. हे हायड्रोजन इंधन 70 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाऊ शकेल, अशी माहिती गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या या कार्यक्रमात त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरु भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांना ही उपाधी प्रदान केली. विद्यापीठाच्या 36 व्या पदवी दान समारंभात गडकरींना ही उपाधी देण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु डॉ. मोतीलाल मादन, उपकुलगुरु डॉ. विलास भाले, विद्यापीठाचे प्राध्यापक, अध्यापक व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शेतकऱयांना संदेश
शेतकऱयांनाही गडकरी यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. शेतकरी यापुढे केवळ अन्नधान्य निर्माते राहणार नाहीत. तर त्यांना ऊर्जा निर्मातेही व्हावे लागणार आहे. केवळ गहू, तांदूळ आणि जोंधळे पिकवून यापुढे शेतकऱयांचे भागणार नाही. तर त्यांना इंधनाच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल उत्पादन करावा लागणार आहे.