मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी बँक खाते असणे आवश्यक
बेळगाव : शालेय शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. परंतु, ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे बँक खाते नसल्याने पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यास सांगण्यात आल्याने बुधवारी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून प्रतिवर्षी एक हजार रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षणासोबत लागणारे इतर साहित्य खरेदीसाठी या शिष्यवृत्तीचा उपयोग व्हावा, यासाठी प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीला अर्ज करताना आधारकार्ड व बँक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. परंतु, ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे बँक खाती नसल्यामुळे मागीलवर्षी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. यामुळे यावर्षी असा प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक गावामध्ये राष्ट्रीयीकृत बँका नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बँक खाते उघडावे लागत आहे. बँक खाते उघडण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी, तसेच ऑनलाईन प्रक्रिया करावी लागत आहे. त्यापेक्षा पोस्ट विभागामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत अवघ्या दहा मिनिटांमध्ये खाते उघडले जात आहे. खाते उघडल्यानंतर पोस्ट खात्याकडून शंभर रुपये खात्यावर जमा करण्याची सूचना केली जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सोय
मागील दोन दिवसांपासून पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे लक्षात येताच स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पासपोर्ट कार्यालयाशेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत विद्यार्थ्यांना खाते उघडून देण्यात आले. महिलांच्या पेन्शन ई-केवायसीसाठीही व्यवस्था केली.