काँग्रेस प्रवक्त्या डॉ. तेजस्विनी गौड : कब्बूर येथे प्रचारसभा
बेळगाव : जातीचे राजकारण करण्यात भाजप मग्न आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. देशाच्या विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन केपीसीसी प्रवक्त्या डॉ. तेजस्विनी गौड यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ कब्बूर येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. मतदारांनी सर्वाधिक मतदान करून बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील दुष्काळी स्थिती निवारण्यासाठी 18 हजार कोटींचा प्रस्ताव दिला होता. मात्र, केंद्राने केवळ 3 हजार 500 कोटी अनुदान दिले आहे. यासाठी सरकारला न्यायालयात धाव घ्यावी लागली. केंद्राकडून राज्यावर अन्याय झाला असून या सरकारला योग्य धडा शिकविला पाहिजे. या विरोधात जनतेने आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने पाच गॅरंटी योजना राबवून गरिबांना मदतीचा हात दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाल्यास महिलांना 1 लाख देण्यात येणार आहेत. इतर 25 गॅरंटी योजनाही जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाणार आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक मिलन पाटील, केपीसीसी कार्यदर्शी महावीर मोहिते, अर्जुन नाईकवाडी, निर्मला पाटील आदी उपस्थित होते.