वृत्तसंस्था/ नागपूर
कसोटी क्रिकेट हा खरेच एक वेगळा खेळ आहे, पण सूर्यकुमार यादव त्याचे अप्रतिम कौशल्य आणि चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता घेऊन कसोटीत खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे, असे मत महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. ‘टी20’ आणि एकदिवसीय संघात प्रवेश करण्यापासून आता कसोटी संघात प्रवेशास सज्ज होईपर्यंत त्याने एक अविश्वसनीय छाप पाडली आहे. जे कोणी सूर्याच्या खेळाचा पाठपुरावा करतात ते त्याच्या क्षमतेच्या आणि त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीच्या प्रेमात पडतात, असे तेंडुलकरने म्हटले आहे.
पण कसोटी क्रिकेट वेगळे आहे. सूर्या कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज दिसतो. त्याच्यासाख्या पात्रतेच्या खेळाडूचा के. एल राहुल आणि शुबमन गिल यांच्यासोबत विचार केला पाहिजे. तिघेही समर्थ खेळाडू आहेत. मला येथे कोणताही निर्णय सांगायचा नाही, परंतु तिघेही संघात प्रवेश करण्यास सक्षम आहेत, असे मत तेंडुलकरने व्यक्त केले. आदर्श संघ कुठला या वादात अडकण्याची इच्छा नसलेल्या सचिनने संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी सातत्य आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मला संघ रचना आणि त्या सर्व गोष्टींमध्ये जायचे नाही. परंतु जर आपण अलीकडच्या काळाचा विचार केला, तर शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि राहुल योगदान देऊ शकलेला नाही. परंतु जीवन असेच असते आणि चढ-उतारांमधून जावे लागते. दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी एखाद्याने धावा करत राहणे आवश्यक आहे, असे तेंडुलकरने सांगितले.
भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली आणि एकदिवसीय सामन्यांत त्याला पुन्हा मिळालेला सूर याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ते घडले आणि हे संघासाठी चांगले आहे. नॅथन लियॉन आणि कोहली यांच्यातील लढत पाहण्यास सचिन नक्कीच उत्सुक असेल. जागतिक क्रिकेटला अशा प्रकारच्या शत्रुत्वाची गरज आहे, असे त्याने सांगितले. या मालिकेतील दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत चेतेश्वर पुजारा आपला 100 कसोटी सामन्यांचा टप्पा गाठणार आहे. कसोटीत 7 हजारांहून अधिक धावा केलेल्या पुजाराची कामगिरी आणि त्याचे संघातील महत्त्व यांना हवी तितकी प्रतिष्ठा मिळालेली नाही, असे मत तेंडुलकरने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनला डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कची उणीव जाणवेल आणि त्यामुळे लियॉनचा प्रभावही कमी होईल असे तेंडुलकर म्हणाला. एरव्ही चेंडू जुना झाल्यावर फिरकी गोलंदाजाला आणण्याचा विचार होतो. मात्र अश्विनच्या हाती पहिल्या तासातच चेंडू देण्याचा विचार होऊ शकतो. तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, असे सचिन म्हणाला.