पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. केवळ खोके-बोके, कुत्रा-मांजर अशी चर्चा सुरू आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का..? म्हणूनच 2024 ला स्वराज्य पक्ष निवडणूक लढवणार आहे. तुम्ही तयारीला लागा. महाराष्ट्रास वेगळी दिशा देण्याचे काम आपण या पक्षाच्या माध्यमातून करू, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पुण्यात पार पडले. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले, राजकीय पक्ष केवळ शिवराय व शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. मात्र, प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. राजकारणाची पातळी आता घसरली आहे. विकासाचे मुद्दे बाजूला सोडून खोके-बोके, कुत्रा-मांजर अशी चर्चा सुरू आहे. राज्यात माजलेले राजकारणी आहेत. हे राजकारणी आपला खेळ खेळायला चालले आहेत. तेच नेते तीच चर्चा, यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळे हे चित्र आता बदलायला पाहिजे. आपल्याला स्वराज्याच्या माध्यमातून या महाराष्ट्राला वेगळी दिशा द्यायची आहे. त्यासाठीच आपण 2024 ची निवडणूक लढविणार आहोत.
दरम्यान, या अधिवेशनात राज्यातल्या सर्व निवडणुका स्वराज्य पक्ष लढणार आहे, असा ठराव आज मंजूर करण्यात आला आहे .यासह भारतीय संविधान समर्थन व संरक्षण करणे, शेतमालास हमीभाव, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, स्वयंरोजगार व उद्योग क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळवून देणे असे विविध सात ठराव ही या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.