पुणे / प्रतिनिधी :
‘आम आदमी पार्टी’ने आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी ‘स्वराज्य यात्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेची सुरुवात रविवारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन होणार आहे. तर रायगड येथे राज्याभिषेकदिनी (ता. 6) स्वराज्य यात्रेची सांगता होणार आहे.
ही यात्रा सात जिल्ह्यांतून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे आणि गावांमध्ये सभा होणार आहेत. तब्बल 782 किलोमीटरचा प्रवास यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व युवा नेते गोपाल इटालिया, धनंजय शिंदे, विजय फाटके आदी उपस्थित होते.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपनेही कंबर कसल्याचे दिसत आहे. दिल्ली आणि हरियाणातील यशानंतर देशातील वेगवेगळय़ा राज्यांमध्ये पक्षाचे नेटवर्ग वाढविण्याचा पक्षाचा मानस आहे. एका बाजूला दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. तर दुसऱया बाजूला केजरीवाल हे विरोध पक्षांतील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपची रणनीती काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ‘आप’कडून राज्यातील राजकीय स्थितीची चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.