मंत्री खंवटे, आमदार केदार नाईक यांनी केली पाहणी – पर्वरी, साळगावात टँकरद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा
म्हापसा : पर्वरी व साळगाव मतदारसंघात गेले चार दिवस पाणीपुरवठा झाला नसल्याने नळ कोरडे पडले आहेत. दोन्ही भागातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाले आहेत. त्यांना ‘मिनरल वॉटर’चा वापर करावा लागत आहे. पाणीपुरवठा न होण्याचे कारण कुणालाच माहीत नसल्याने नागरिकांनी आमदारांच्या, मंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन तसेच फोनवरून जाब विचारला. मंत्री, आमदारांनी प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच संबंधीत अधिकाऱ्यांशी, मंत्र्यांशी चर्चा करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तरीही आणखी दोन दिवस पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाही. तिळारीहून येणारे साधे पाणी (रॉ वॉटर) येत नसल्याने पर्वरी व साळगाव भागातील नागरिकांना पाण्याचा त्रास झाल्याचे नंतर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तिराळीच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. पुढील दोन दिवस तरी पाण्याअभावी दिवस घालवावे लागणार आहेत. आज बुधवारी सकाळी 11 वा. साळागवचे आमदार केदार नाईक आपल्या कार्यकर्त्यांसमवेत अभियंते म्हापणे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार आहेत. गेल्या 10 दिवसांपासून पाण्याची समस्या अधिक बिकट झाल्याची माहिती पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. ऐन इस्टरच्या दिवसात पाणी प्रकल्प पूर्णत: आटलेला आहे. आपण मंत्री नीलेश काब्राल यांच्याशी बोलणी केल्यानंतर त्यांनी या भागात त्वरित पाण्याचे टँकर सुरू केले. साळगाव व पर्वरी मतदारसंघात योग्यरित्या पाणी पुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याबाबत त्यांच्याशी बोलणी केली आहे, असेही खंवटे म्हणाले.
अधिक कर्मचारी पाठविण्याची विनंती
पाईपलाईन पूर्वपदावर आणण्यासाठी पंधरा दिवसाचे काम असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी बोलणी करून अतिरिक्त कामगार पाठवून हे काम आठ दिवसात पूर्णत्वाकडे न्यावे अशी विनंती केली आहे. अस्नोडा येथे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. शिवाय अतिरिक्त 5 टँकरची व्यवस्था केली आहे. पुढील दोन दिवसात पर्वरी व साळगाववासियांना नियमित पाणी पुरवठा होईल. पुढील 10 दिवसात नवीन पाईपलाईन झाली की ‘रॉ वॉटर’ गिरी येथे येऊन त्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी सर्वत्र जाईल, असे मंत्री खंवटे म्हणाले.
वॉट्सअॅप ग्रुप, हेल्प लाईनवर तक्रार करा
आमचे वॉट्सअॅप ग्रुप आहेत. शिवाय हेल्प लाईन आहे. त्याद्वारे पाणी कुठे पोचत नसल्यास त्याची माहिती नागरिकांनी द्यावी. त्यांना पाणीपुरवठा केला जाईल, असे खंवटे म्हणाले.