गगनबावडा प्रतिनिधी
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी लक्षवेधी ठरली आहे. संपूर्ण राज्यात गेले महिनाभर तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोल्हापूर जिह्यातील शिवसेनेचे आमदार तसेच दोन माजी आमदार यापूर्वीच बंडखोर सेनेत सामील झाले आहेत. उशिरा का असेना, कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी शिंदें गटात सहभागी होण्याच्या दृष्टीने हालचाली गतीमान केल्यामुळे अनेकांना अनपेक्षित धक्का बसला. याचे जिह्यातील राजकारणावर विपरीत परिणाम होणार आहेत. आगामी काळात गगनबावडा तालुक्यातील काही ठिकाणी राजकीय उलथापालथी होणार आहेत.स्थानिक राजकारणावर यांचा थोडाफार परिणाम होणार आहे.
गगनबावडा तालुक्यात 29 ग्रामपंचायती व 44 गावांचा समावेश आहे. राजकीय पटलावर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, जनसुराज्य शक्ती, ताराराणी आघाडी, बहूजन मुक्तीमोर्चा व अन्य पक्ष कार्यरत आहेत. तालुक्यात वेळोवेळी होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने वेगळेपणा जपला आहे. सामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ, न्याय देणे यासाठी सभासद नोंदणी करणे असे अनेक उपक्रम सेवाभावी वृत्तीने यशस्वी करून जनमाणसांत आपलेपणा निर्माण केला आहे. शिवसेनेच्यावतीने पन्हाळा, गगनबावडा तर नंतर करवीर विधानसभेतून असे सलग दोनवेळा चंद्रदीप नरके मताधिक्याने निवडून आले होते.
तालुक्यात चंद्रदिप नरके गट राजकारणात सक्रीय आहे. खासदार संजयदादा मंडलिक यांना तालुका शिवसेनेने संपूर्ण ताकद दिली. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा ’आपलं ठरलंय’ पॅटर्न राज्यभर गाजला. परिणामी 90 टक्के तालुका मंडलिक यांच्या पाठीशी राहिला होता. तत्कालीन निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती असली तरी तुलनात्मकदृष्टय़ा तालुक्यात शिवसेनाच वरचढ ठरली. तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या चारपैकी तीन तर जि.प.च्या दोन्ही जागा राष्ट्रीय कॉंग्रेसकडे आहेत. पण काही ग्रामपंचायतीत शिवसेनेकडे सत्ता आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाडीची मदत घेतली आहे. तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. तरीसुद्धा अस्तित्वासाठी शिवसेनेने जि.प.च्या दोन्ही गटात निवडणूक लढवली होती.
तालुक्यात जि.प.चे. दोन गट आहेत. असळज गट कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या उभारणीपासून माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाची ताकद येथे आणखी मजबूत झाली आहे. या अंतर्गत तालुका पंचायत समितीच्या दोन्ही मतदारसंघांत सतेज पाटील गटाचे प्राबल्य आहे. तिसंगी गटात गतवेळी तिरंगी लढत झाली होती. सतेज पाटील समर्थक भगवान पाटील विजयी झाले होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनेचे बंकट थोडगे विजयासमीप गेले होते. बदलत्या राजकारणाचा तालुक्यावर परिणाम होण्याचे संकेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या ठिकाणी गट-तट नव्याने आकारास येत आहेत.
तालुक्यात अनेक राजकीय गट आहेत. पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत राजकारणाचा पगडा अधिक आहे. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हे दिसून आले आहे. शिवसेनेतील बंडाळीचा कळत-नकळत परिणाम येथील राजकारणावर होणार आहे.