केसीआर यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची गर्जना
हैदराबाद / वृत्तसंस्था
केसीआर यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जोरदार गर्जना केली. तेलंगणातील जनतेला बदल हवा आहे. त्याचबरोबर तेलंगणाला दुहेरी इंजिनचे सरकार हवे आहे, असेही ते म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी भाजपच्या विजय संकल्प सभेला संबोधित केले. जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान परेड ग्राऊंडवर पोहोचले. याप्रसंगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
तेलंगणाचा सर्वांगीण विकास हे भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या प्राधान्यांपैकी एक आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला अनुसरून आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. हैदराबाद शहर सर्व प्रकारच्या कौशल्यांच्या अपेक्षांना प्रोत्साहन देते. तसेच भाजपही देशाच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तेलंगणातील गरिबांना मोफत रेशन मिळाले पाहिजे, गरजूंना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. भाजप सरकारच्या धोरणांचा भेदभाव न करता सर्वांना लाभ मिळत आहे. हे सबका साथ, सबका विकास असल्याचे ते म्हणाले. 2019 च्या निवडणुकीत तेलंगणात भाजपला मिळालेला जनसमर्थन सातत्याने वाढत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी महिलांसाठीच्या विशेष योजनांचेही दाखले दिले. देशातील महिलांमध्ये आज आपले जीवन सुकर झाल्याची भावना निर्माण झाली आहे. महिलांसाठी भाजपप्रणित सरकार विविध योजना राबवत आहे. साहजिकच राष्ट्राच्या विकासातही आता महिला अधिक योगदान देऊ शकतात. भाजपच्या या सेवाभावनेचा लाभ तेलंगणातील प्रत्येक गरीब, मागास, दलित आणि मध्यमवर्गाला मिळाला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
केसीआर यांचे पतन निश्चित ः नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही या सभेला संबोधित केले. आज येथे उपस्थित मोठा जनसमुदाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आज जमलेली गर्दी पुढे क्रांती घडणार असल्याचे सुचित करत आहे. साहजिकच आगामी काळात केसीआर यांचे जाणे निश्चित असून पुढील निवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.