वृत्तसंस्था/ लंडन
‘आयपीएल’ ही जगाला हेवा वाटण्यागत बनलेली असल्याने भारताचे माजी यष्टिरक्षक फारूख इंजिनियर यांना आनंद वाटत असला, तरी कसोटी क्रिकेटला ‘डेंजर झोन’मधून बाहेर काढायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. खेळाच्या धडाकेबाज आवृत्तीच्या भरभराटीसाठी पारंपरिक स्वरूपाचा बळी देता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखी आर्थिकदृष्ट्या मजबूत राष्ट्रे कसोटी क्रिकेट खेळण्यास बांधील असल्याचे दिसून येत असले, तरी लहान देशांचे खेळाडू मात्र चांगले पैसे मिळत असल्याने जगभरातील फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत आहेत कारण ते चांगले पैसे देतात. ‘कसोटी क्रिकेट धोक्यात येणे ही चांगली गोष्ट नाही. ‘टी20’ लीगच्या माध्यमातून जगभरात खेळाची भरभराट होत आहे हे चांगले आहे, पण कसोटी क्रिकेटचा कधीही बळी देता कामा नये’, असे इंजिनियर यांनी म्हटले आहे.
जागतिक कसोटी स्पर्धा कसोटी क्रिकेट हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटइतकेच मनोरंजक असू शकते ही बाब जगाला दाखवून देणारी आहे. हा परिस्थितीवर अवलंबून असलेला बुद्धिबळाचा खेळ आहे. फलंदाजांसाठी ही अंतिम परीक्षा आहे. कसोटी आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट, दोन्हींसाठी जागा असली पाहिजे, असे मत 85 वर्षीय इंजिनियर यांनी व्यक्त केले. ते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी त्याच्या मँचेस्टर येथील निवासस्थानाहून लंडनला आले आहेत.
ओव्हल येथे हा अंतिम सामना खेळला जात आहे, जिथे भारताने 1971 मध्ये इंग्लंडमधील पहिली कसोटी जिंकली होती. पहिल्या डावात 59 धावांची खेळी करून इंजिनियर यांनी त्या महत्त्वपूर्ण विजयात मोठी भूमिका बजावली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे या वयातही ते जगभरातील ‘टी20 लीग’सह क्रिकेट पाहत आहेत. याचे कारण त्यांना वाटते की, काळाशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. ‘कसोटी क्रिकेटमध्ये भारताने आघाडी घेतली आहे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमच्याकडे जगाला हेवा वाटावीशी आयपीएल आहे. भारतीय क्रिकेटकडे सध्या सारी सूत्रे आहेत आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो’, असे त्यांनी सांगितले.
इंजिनियर हे विराट कोहलीचे चाहते आहेत. शुभमन गिल हा खूप चांगला फलंदाज आहे आणि तो फॉर्ममध्ये आहे. पण त्याला विराटचा वारसदार म्हणणे म्हणजे खूप घाई केल्यासारखे होईल, कारण विराटकडे आणखी काही चांगली वर्षे शिल्लक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.