पुणे / प्रतिनिधी :
पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक मंडळातर्फे (बालभारती) तयार केल्या जाणाऱ्या पाठय़पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडली जाणार आहेत. पथदर्शी पद्धतीने स्वरुपात राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत प्रत्येक घटक, पाठ, कविता यांच्या शेवटी कोरे पान जोडले जाणार असून, पुस्तकांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर आता पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केला. पाठय़पुस्तकांमध्ये जोडलेल्या कोऱ्या पानावर विद्यार्थ्यांनी वर्गात अध्यापन सुरू असताना शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, टिपण काढणे अपेक्षित आहे. पाठय़पुस्तकातील ही कोरी पाने माझी नोंद या सदराखाली वापरणे आवश्यक आहे. शाळेत शिक्षक काय शिकवतात, वर्ग कार्याचा स्तर कसा आहे हे या नोंदीवरून समजू शकते. तसेच त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करता येऊ शकते.
पाठय़पुस्तकातील प्रश्नांव्यतिरिक्त सराव, वर्गकार्य, गृहपाठ यासाठी विद्यार्थ्यांना वेगळय़ा वह्या वापरण्याची मुभा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरी ते आठवी या इयत्तांसाठीची पाठय़पुस्तके एकात्मिक स्वरुपात चार भागांमध्ये विभागून तयार करावीत. पहिली आणि दुसरीची पाठय़पुस्तकेही चार भागांमध्ये तयार करून त्यात आवश्यकतेनुसार सरावासाठीची पाने समाविष्ट करावीत. नववी आणि दहावीच्या पाठय़पुस्तकांच्या अनिवार्य विषयांची चार भागांमध्ये विभागणी करावी. श्रेणी, वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून द्यावीत. श्रेणी आणि वैकल्पिक विषयांची पाठय़पुस्तके चार भागांमध्ये समाविष्ट न करता विद्यार्थी, पालक, विक्रेते आणि शासकीय योजनेत होणाऱ्या मागणीनुसार स्वतंत्र पाठय़पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, असे नमूद करण्यात आले आहे.
अधिक वाचा : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; मॉर्निंग वॉकदरम्यान घडली घटना