नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एक दिवस आधीच त्यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव नोंदवले होते. त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जांचे पाच संच मागवले होते. या शर्यतीत आतापर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर होते. आता थरूर यांचे नाव पुढे आल्याने दोघांमध्ये थेट लढत होऊ शकते. गांधी कुटुंबातील सदस्यांनी नकार दर्शवल्यामुळे आता इतरांना उमेदवारी दाखल करण्याची संधी मिळाली आहे. सद्यस्थितीत आणखी दोन-चार नावे चर्चेत असली तरी अशोक गेहलोत यांना सर्वाधिक प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे.