अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचे प्रांजळ मत : प्रेक्षकांना गृहीत धरून चालणार नाही : सिनेमा-शिक्षण एकत्र चालायला हवेत : कार्यशाळा निश्चितच उपयुक्त
अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचे प्रांजळ मत : प्रेक्षकांना गृहीत धरून चालणार नाही : सिनेमा-शिक्षण एकत्र चालायला हवेत : कार्यशाळा निश्चितच उपयुक्त
मनीषा सुभेदार / बेळगाव
चित्रपट, नाटक किंवा मालिका यामधील साचलेपणाचा प्रेक्षकांना कंटाळा येतो. एकच गोष्ट सातत्याने बघण्याचा मानवी स्वभाव नाही. आज हिंदी चित्रपटसृष्टीला मराठीसह प्रादेशिक चित्रपट चांगलीच टक्कर देत आहेत. फक्त प्रेक्षकांना आपल्याकडे वळविण्यामध्ये आम्ही कमी पडत आहोत. प्रेक्षकांना गृहीत न धरता त्यांना सकस आशयाचे मनोरंजन देणे ही आमची जबाबदारी आहे, असे मत चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेले अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये लवकरच एका चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या निमित्ताने बेळगावला आल्यावेळी त्यांनी ‘तरुण भारत’ला सदिच्छा भेट दिली. ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले.
प्रश्न : चित्रपट किंवा नाटय़सृष्टीशी आपण कसे जोडले गेलात? घरात तसे पोषक वातावरण होते का?
- हो! मी खूप सुदैवी आहे. माझ्या आई-वडिलांना साहित्य, संगीत, कला यांची उत्तम जाण आहे. आई सुमित्रा शिवाजी विद्यापीठामध्ये ग्रंथपाल म्हणून काम करत होती. त्यामुळे पुस्तकांशी अर्थातच साहित्याशी तिचा अधिक संबंध होता. ‘सिनेमा बघून मुले बिघडतात’ या समजाला छेद देईल असे वातावरण आमच्या घरी होते. वडील उत्तम चित्रपट आणून ते व्हीसीआरवर आम्हाला दाखवत. त्यामुळे चित्रपट कसा पहावा, याचे आकलन आम्हाला झाले. आज या टप्प्यावर प्रेक्षकांनासुद्धा त्या बाबतीत आपण सजग करायला हवे, असे मला वाटते.
प्रश्न : दहावीनंतर आपण अभिनय कार्यशाळांसाठी मुंबईला गेलात. कार्यशाळा उपयुक्त ठरतात का?
- याचेही उत्तर होकारार्थीच आहे. मी फारसा अभ्यासात रमलो नाही. परंतु सिनेमा क्षेत्रामध्ये शिक्षणाची गरज नाही, हा चुकीचा समज आहे. वास्तविक सिनेमा आणि शिक्षण हातात हात घालून एकत्र चालायला हवेत. अनेक नामवंत दिग्दर्शक आणि कलाकारांच्या कार्यशाळांमधून मी खूप काही शिकलो आहे. त्यामुळे पुढे रुपारेल कॉलेजला मला प्रवेश मिळणे सुकर झाले. दुसरे म्हणजे आपण प्रात्यक्षिकांतून खूप काही शिकत असलो तरी थेअरीचे ज्ञान हवेच. कार्यशाळांमध्ये तंत्र आणि तंत्रज्ञान याचे आकलन होते. मुख्य म्हणजे कोठेही काहीही शिकलो तरी ते कधी ना कधी उपयुक्त ठरते. कोणत्याही स्वरुपाचे शिक्षण वाया जात नाही.
प्रश्न : अलीकडे मुलांवर अभिनय शिकण्याची सक्ती केली जाते, परंतु उत्स्फूर्तता महत्त्वाची नाही का?
- पालकांना नाटक ही गरज वाटत नाही. एखाद्या छोटय़ा मालिकांमध्ये मुले चमकली तरी ते त्यांना पुरेसे ठरते. अभिनय असा एका रात्रीत किंवा एका मालिकेमधून शिकून होत नाही. त्यासाठी कष्ट, चिकाटी आणि इतरांचे अनुभव ऐकणे, निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे.
प्रश्न : आशय उत्तम असूनही मराठी प्रेक्षक आणि निर्माते यांच्यामधील दरी कमी कशी करता येईल?
- ही जगभरातील समस्या आहे. चित्रपटगृहाला प्रेक्षक न लाभणे यासाठी प्रेक्षक दोषी नाहीत. जे उत्तम आहे ते पोहोचविण्यामध्ये आम्ही कमी पडत आहोत. ‘प्रसिद्ध तेच चांगलं व गाजतं ते वाजतं’ असे मानले गेले की सर्व कठीण होईल. मात्र, आस्वादक समीक्षा किंवा परीक्षणात्मक लेखन बंद झाल्याचाही परिणाम असेल का? असे विचारता त्यांनी सहमती दर्शवत आपण प्रेक्षकांना गृहीत धरतो. त्यांना एकाच साच्यात बांधून ठेवू पाहतो हे थांबवायला हवे, असे ते म्हणाले. शेवटी जे प्रेक्षकांना आवडतं तेच टिकतं.
प्रश्न : मराठी चित्रपटसृष्टीची सतत हिंदीबरोबर तुलना कितपत रास्त आहे?
- हिंदीचे मार्केट राष्ट्रीय पातळीवर आहे. त्यांचा आवाका मोठा आहे. पाच रुपये आणि 50 रुपये याच्यात निश्चितच फरक असतो. दुसरे म्हणजे हिंदी शीर्षक पाहूनही प्रेक्षक नापसंती दर्शवितात. परंतु कधी कधी ती आशयाची गरज असते किंवा एखादे पात्र मिश्र स्वरुपाचे संवाद बोलणारे असते, हे पण लक्षात घ्यायला हवे. पुन्हा चित्रपटगृहांचा प्रश्न आहे. मुंबईनंतर अलिबाग, चिपळूण, कणकवली व रत्नागिरी येथे फक्त एक एक चित्रपटगृहे आहेत. परत त्यांची स्थिती हाही चिंताजनक प्रश्न आहे. शासनदरबारी काही गोष्टी रखडतात. त्यामुळे तुलना योग्य ठरणार नाही. जोपर्यंत केवळ मनोरंजन नव्हे तर एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपण या सर्व पैलूंकडे पाहत नाही तोपर्यंत अडचणी येत राहणार. तथापि, भारतीय चित्रपट म्हणजे केवळ हिंदी चित्रपट ही मानसिकता बदलली आहे, हे महत्त्वाचे.
प्रश्न : अलीकडे निखळ विनोद दुर्मीळ होत तो विकृतीकडे वळतो आहे, याचे कारण काय?
- तीच तीच गोष्ट प्रेक्षकांना आवडत नाही. विनोद हा असा प्रकार आहे जो प्रेक्षकांना पटकन आकर्षित करतो. परंतु त्यात निखळ विनोद नसेल, आशय अर्थहीन असेल तितक्मयाच तातडीने त्याचा कंटाळाही येतो. त्यामुळे नवीन काय द्यावयाचे? हे वाहिन्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. त्या तुलनेत नाटकाने मात्र अद्यापही दर्जा आणि पावित्र्य जपले आहे.
प्रश्न : कलाकार म्हणून अस्तित्व टिकविणे आणि आपल्या आवडीला मुरड घालणे कठीण होत नाही का?
- नक्कीच होते. सर्वच कामांतून आनंद मिळतो असे नाही. अर्थार्जनासाठी काही तडजोडी कलाकाराला कराव्याच लागतात. त्याला पर्याय नाही. परंतु आत्मिक समाधान ज्यामधून मिळते तेही शोधायला हवे. माझ्यासाठी ते सिनेमा आणि नाटक यामधून मिळते.