मोठय़ा प्रमाणात कचराही वाहून येण्याच्या घटना, पर्यटकांसह किनाऱयांवर येणाऱया लोकांना त्रास
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याच्या किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिवस साजरा केला जात असताना सासष्टी किनारपट्टी भागांत तेलगोळे तसेच मोठय़ा प्रमाणात कचरा वाहून येण्याच्या घटना घडल्या आहेत. कोलवा, बाणावली, माजोर्डा, सुरावलीसारख्या समुद्रकिनाऱयांना त्याचा फटका बसला आहे. किनाऱयांची स्वच्छता हाताळणारी एजन्सी हा कचरा तसेच तेलगोळे हटविण्यासाठी झटत आहे. जाळ्यात अडकून व वाहून आलेल्या कचऱयामध्ये कापड, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱया दोऱया आणि मृत मासे समाविष्ट आहेत.
बाणवली, कोलवा व लगतच्या अन्य किनाऱयांवर तेलकट गोळे आढळून आले आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱयांवर येणाऱया पर्यटकांसह लोकांना त्रास होत आहे. मे महिन्यात मान्सून सुरू होण्यापूर्वी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत पावसाळ्यानंतर गोव्याच्या समुद्रकिनाऱयांवर तेलगोळे येणे ही एक वार्षिक बाब बनली आहे. समुद्रकिनाऱयांवर तैनात असलेले जीवरक्षक किनाऱयांवर येणाऱयांना सावधगिरीने चालण्याच्या सूचना देताना दिसत होते.
सदर तेलगोळे पायांना चिकटतात तसेच अंगाला स्पर्श झाल्यास ते हानिकारक ठरत असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. समुद्रात मोठी जहाजे तेल सोडत असतात. त्यांचे तेलगोळे बनून ते किनाऱयांवर येत असतात. असे असले, तरी त्याची विल्हेवाट लावण्याच्या बाबतीत समस्या येत असतात. ते पर्यावरणासाठी बाधक असून या तेलगोळ्यांची कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावली जावी याचा अभ्यास नसल्याने खड्डा खोदून ते त्यात टाकले जातात. ही पद्धत मागील काही वर्षांपासून राबविली जात आहे.