500 हून अधिक वर्षांचा संघर्ष लोकांसमोर अवतरणार, राम मंदीरासंबंधीही सविस्तर माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अयोध्येतील रामजन्मभूमीवर एक भव्य राममंदिर सांप्रतच्या काळात निर्माणाधीन आहे. ते येत्या दोन ते तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा गेल्या 500 वर्षांमधील संपूर्ण आढावा घेणारा एक बोधपट लवकरच भाविकांना पहावयास मिळणार आहे.
भव्य राममंदिराची निर्मिती करणाऱया रामजन्मभूमी न्यासाकडून या बोधपटाची निर्मितीही होणार आहे. मुस्लीम आक्रमक बाबर याचा सरदार मीर बाकी याने अयोध्येतील मंदीर तोडून त्यास्थानी बाबरी मशिदीची निर्मिती केली, असे मानले जाते. तेव्हापासूनचा, अर्थात, गेल्या 500 हून अधिक वर्षांपूर्वीपासूनचा ते सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयापर्यंतचा इतिहास या बोधपटात (डॉक्युमेंटरी) पहावयस मिळणार आहे. त्याचप्रमाणे सध्या निर्माणाधीन असणाऱया भव्य राममंदीराची सविस्तर माहितीही या बोधपटातून मिळणार आहे.
इतिहास ते वर्तमान आणि भविष्य
1 सहस्र वर्षांहून अधिक काळ राहील असे भक्कम आणि भव्य राममंदीर सध्या निर्माण केले जात आहे. या मंदिराला मध्ययुकातील सशस्त्र संघर्ष ते वर्तमान काळातील न्यायालयीन संघर्ष अशी व्यापक पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी हे प्रकरण न्यायालयात होते, तेव्हा हा सर्व इतिहास आणि वर्तमानकालीन घडामोडींना वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमांमधून व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, अल्पकालावधीत आणि सोयीस्कर रित्या हा सर्व घटनाक्रम आणि या संपूर्ण संघर्षाचा इतिहास रामभक्तांना तसेच इतर सर्व लोकांना एकत्रितरित्या समजावा, यासाठी हा बोधपट निर्माण केला जात आहे, अशी माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.
पुढच्या पिढय़ांसाठी…
सध्याच्या पिढीला बाबरी मशिद ते भव्य राममंदीर असा घटनाक्रम परिचित आहे. कारण तो या पिढीच्या जीवनकाळात डोळय़ांसमोर घडला आहे. मात्र, या पुढच्या पिढय़ांना अयोध्येत केवळ भव्य राममंदीर दिसणार आहे. त्याची पार्श्वभूमी आणि त्यासाठी पूर्वीच्या 20 पिढय़ांनी केलेला संघर्ष त्यांना परिचित असणार नाहव त्यामुळे ही सर्व पार्श्वभूमी पुढील पिढीतील लोकांनाही समजावी, तसेच त्यांचे प्रबोधन व्हावे, यासाठी हा बोधपट महत्वाची भूमिका साकारणार आहे.
काय असणार बोधपटात
बाबरापासूनचा इतिहास, बाबरी बांधल्यानंतर तेथे राममंदीर पुनर्स्थापित करण्यासाठी हिंदूंनी कसा आणि कितीदा संघर्ष केला, उत्तर भारतातील साधूंनी कितीदा या मंदिरासाठी स्वतःचे रक्त सांडले आणि स्वतःचे बलिदान कशाप्रकारे दिले, ब्रिटीशांच्या काळात सशस्त्र संघर्ष तसेच न्यायालयीन संघर्ष कशा प्रकारे झाले, त्यांचे परिणाम काय झाले, स्वातंत्र्योत्तर काळात 1948 पासूनचा संपूर्ण न्यायालयीन संघर्ष, बाबरीचे पतन, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आणि त्यानंतर भव्य राममंदीर निर्माण करण्यासाठी साकारण्यात आलेली योजना व तिचे क्रियान्वयन या साऱया घटनाक्रमाची साद्यंत माsिहती या बोधपटात असेल. रामजन्मभूमीच्या स्थानी उत्खननात हाती आलेले सबळ ऐतिहासिक पुरावेही पहावयास मिळणार आहेत. तसेच रामजन्मभूमीसंबंधीची महत्वाची पुरातन कागदपत्रेही आपल्याला बघावयास मिळतील, अशी माहिती देण्यात आली आहे.