नदी सापडली अतिक्रमण, झाडा-झुडुपांच्या विळख्यात : कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ : प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्याची मागणी
वार्ताहर /किणये
संतिबस्तवाड-किणये परिसरातील मुंगेत्री नदी झाडा-झुडुपांनी व्यापली आहे. नदी केरकचरा व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे या नदीचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. नदीचे अस्तित्व वाचविण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. प्रशासनाकडून लघु पाटबंधारे खात्यामार्फत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, ग्रामीण भागात ही योजना अपयशी ठरू लागली आहे, असे दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंगेत्री नदीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत.
पश्चिम भागातील किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडे या परिसरात मुंगेत्री ही एकमेव नदी आहे. नदीत झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. संतिबस्तवाड पुलाजवळ तर मोठय़ा प्रमाणात नदीमध्ये झाडा-झुडुपांची वाढ झाली आहे. यामुळे पावसाळय़ात नदीतून पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे नदीचे पाणी बाजूने वाहत असते. यामुळे आजूबाजूच्या शेतशिवारात असलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.
गेली दोन वर्षे मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे नदी काठावरील पिके पूर्णपणे पाण्याखाली जाऊन शेतकऱयांचे नुकसान झाले होते.
नदीत केरकचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. किणये पुलाजवळ तसेच संतिबस्तवाड, वाघवडे पुलाजवळ नदीत केरकचरा टाकला आहे. प्रशासनाबरोबरच स्थानिक नागरिकांनीही या नदीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली सामाजिक बांधिलकी जपत व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नदीत केरकचरा टाकणे थांबविले पाहिजे.
गाळ काढण्याची गरज-कृष्णा बेळगुंदकर
या भागातील शेतकऱयांसाठी मुंगेत्री नदी जीवनदायी ठरू शकते. पण सध्या नदीच्या नियोजनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. किमान दोन वर्षातून एकदा तरी नदीतील झाडेझुडपे व केरकचरा यांची साफसफाई करून गाळ काढण्याची आवश्यकता आहे. फौंड्रीतील रसायनयुक्त टाकावू माती नदीत टाकणाऱयांवर कारवाई करण्याची गरज आहे.
जनावर मालकांनाही उपयोगी-वैजनाथ डुकरे
शेतीला जोडव्यवसाय म्हणून या भागातील शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. गोठय़ात दोन-चार जनावरे पाळतात. गायी, म्हशी चरावयास सोडतात. या नदीत बऱयापैकी पाणीसाठा झाल्यास दुभत्या जनावरांनाही या नदीचा फायदा होऊ शकतो. नदीची योग्यप्रकारे देखभाल केल्यास शेतकऱयांसह जनावर मालकांनाही नदी उपयोगी ठरणारी आहे.
पाणी अडविण्याची गरज-आप्पाण्णा बस्तवाडकर
संतिबस्तवाड व किणये ग्राम पंचायतींच्यावतीने नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. नदीची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही ग्राम पंचायतींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील ही एकमेव नदी असल्याने अतिक्रमण रोखले पाहिजे. उन्हाळय़ात नदीवरील ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱयांवर पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करायला हवी.