अध्याय सविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, देहामध्ये असलेल्या ईश्वरी अंशावर मायेचा पगडा असतो त्यामुळे तो तिच्या तालावर नाचत असतो. त्या जीवात्म्याला गुरूपदेशाने ज्ञानाचा अनुभव आला की, त्याच्यावरील मायेचा प्रभाव नाहीसा होतो. त्याला लिंगदेह खोटा वाटू लागतो व जीवाचा जीवपणाही मिथ्या होतो. गुरूपदेशाने ज्ञानप्राप्ती झाली की, मायेचे स्वरूप मावळते. अशा प्रकारे सद्गुरूंच्या कृपेने गुणांचे विकार नाहीसे झालेले सद्गुरूंचे शिष्य जीवन्मुक्त होतात. जीवन्मुक्त झालेले भक्त व्यवहार कसा करत असतात असे विचारशील तर, ज्याप्रमाणे घडा तयार झाल्यावरही कुंभाराचे चाक पूर्वी प्राप्त झालेल्या गतीने फिरत रहाते त्याप्रमाणे जीवन्मुक्त पूर्वप्रारब्धानुसार वाटय़ाला आलेले काम करत असतात.
विशेष म्हणजे ते देहस्थितीने वागत असताना त्यांना देहाचा अभिमान असत नाही. त्यामुळे मी कर्ता आहे ही भावना त्यांना शिवतही नाही. कर्तेपण भगवंताकडे दिल्याने हातून केलेले काम भगवंत आपल्याकडून करून घेत असल्याने त्यातून काही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे हे त्यांच्या मनावर पक्के ठसलेले असते. केलेले काम पूर्ण झाले म्हणून कुणी त्यांचे कौतुक करतील किंवा अपूर्ण टाकले म्हणून अपमान करतील असा विचार त्यांच्या मनात कधीच येत नाही. आपल्या छायेला कोणी त्रास दिला किंवा तिची पूजा केली तरी त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, त्याप्रमाणेच ज्ञानी व्यक्ती देहाला त्यांची सावली मानतो आणि मानापमानाची परवा करत नाही. देहाच्याच दैवयोगाने काही ज्ञानी मंडळींची राहणी विलासी असते. त्यामुळे ते विषयात लोळत असले, तरी त्यांची वृत्ती त्या विकाराबरोबर अणुमात्रही मलीन होत नाही. समोर दिसणारे विषय निरर्थक आहेत हे लक्षात घेतल्याने त्यांना विषयांचे दर्शन समूळ मिथ्या असते. जी गोष्ट मिथ्या वाटत असते ती जवळ असली काय आणि नसली काय माणसाला काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे राहणीमान विलासी असले काय वा साधारण असले काय त्याबद्दल काहीही वाटून न घेता ते निजानंदात मग्न असतात. मृगजळ हा एक भासच असतो म्हणून समजा एखाद्याने अशी कल्पना केली की, आपण मृगजळ पिले आहे तरी त्याचे हात ते पिण्याने काही ओले व्हायचे नाहीत. आकाशकमलांचा मकरंद व सुवास हे दोन्हीही काल्पनिक आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन अशक्मयच आहे. तरीही एखाद्या भ्रमराने जर केले असे घडले, म्हणजे अशक्मय गोष्टी शक्मय होऊ लागल्या तरच जीवन्मुक्ताला विषयांशी आलेला सबंध बाधू शकेल. अर्थात असे कधीच घडत नाही हे उद्धवा तुझ्या लक्षात आले असेलच. मुक्त केव्हा कसे वागतील हे सामान्य माणसाच्या लक्षात येणे तसे सोपे नाही म्हणून तर अनेक साधू संतांच्या बोलण्याचा वा कृतीचा काही वेळा मुळीच अर्थ लागत नाही. कारण त्यामागे त्यांचा लोककल्याणाचा भविष्यातला विचार डोकावत असतो किंवा एखाद्या वाममार्गाला लागलेल्या शिष्याला योग्य मार्गावर आणायचे असते. असे जरी असले तरी, कर्म करून आपण फळाची अपेक्षा केली तर संसार बंधनात अडकू शकतो याची जाणीव ज्यांना आहे अशा मुमुक्षु भक्तांना आत्मप्राप्तीसाठी त्याविषयीचे असलेले नियम माहित असणे आवश्यक आहे. संगतीचे परिणाम फार दूरगामी असतात. चांगली संगत असेल तर साधकाची हमखास प्रगती होते परंतु दुर्जनाची संगत मात्र नक्कीच अडचणीत आणते. म्हणून आध्यात्मिकदृष्टय़ा जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात ते दुर्जन होत असे म्हणायला हरकत नाही. दुर्जन म्हणजे दुष्ट लोक. कारण असे लोक दैवयोगाने मिळालेला अमूल्य असा हा नरदेह दुष्टपणा करून वाया घालवत असतात.
अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणाऱयांची अधोगतीच होते. समजा दोन आंधळे एकमेकांच्या संगतीने वाटचाल करू लागले, तर ते हमखास खड्डय़ातच पडणार त्याप्रमाणे कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट होणाऱया व्यक्तीबरोबर साधक जाऊ लागला तर त्यांची अधोगतीच होणार हे निश्चित असते. म्हणून माणसाने वेळीच सावध व्हावे आणि दुर्जनांची संगत सोडून देऊन संतांची संगत धरावी.
क्रमशः