अध्याय बाविसावा
उद्धव भगवंतांना म्हणाला, देवा तुम्ही मोक्ष मिळवण्यासाठी साधकाने परमशांती बाळगावी असे म्हणता पण प्रत्यक्षात हे जवळपास अशक्मय आहे म्हणून हा महान् उपदेश आचरणात आणणे अत्यंत कठीण आहे. एकवेळ कुणी कुणाचा अपराध केला तर कोटय़वधि मनुष्यातून एखादा कोणीतरी तो सहन करेल परंतु हलकट मनुष्याने केलेला छळ कोणीही सहन करणार नाही.
ज्याचे तोंडसुद्धा पाहू नये, ज्याला कधी नमस्कार करणेही उचित नव्हे, त्याने जर डोक्मयावर लाथा मारल्या, तर श्रीकृष्णा! त्या कोण बरे सहन करेल? ज्याच्या शरीरातून प्राण पूर्णपणे निघून गेलेला असेल तोच हा असा अपमान सहन करेल. परंतु जो जिवंत आहे त्याला हे कधीच सहन व्हायचे नाही. जे ज्ञानी असतात ते देखील स्वतःची आज्ञा कोणी थोडीशी मोडली तर सहन करीत नाहीत, मग अपमान सहन करणार कोण? ज्ञानसंपन्न लोकांची ही स्थिती, मग त्यांच्यापुढे इतरांचा पाड काय? गोविंदा! दुसऱयाचे अपराध सहन करण्याइतकी शांती त्रिभुवनातही दुर्लभ आहे हेच यावरून सिद्ध होते.
प्रकृती ही आपल्या गुणांनी प्रबळ झालेली आहे. ती थोडय़ाशा कारणाने देखील गुणांना तत्काळ धुन्ध करिते. तू तर त्रिभुवनामध्ये विश्वात्मा आहेस. तुझ्यापुढे कुणाची चोरी चालायची नाही. मी आपले खरेच सांगतो की, हा दुजाभाव किंवा द्वंद्वे मला सहन करता येणार नाहीत आणि श्रीकृष्णा! हे तुला काही माहीत नाही असे नव्हे! शांती ही अत्यंत पवित्र आहे, क्रोध हा अत्यंत निंद्य आहे, असे प्रतिपादन शहाणे लोक करीत असतात पण त्यांनासुद्धा द्वंद्व खपत नाही. तेथे माझी कथा ती काय? याकरिता हे कृपामूर्ते! द्वंद्वे सहन करता येण्याचा उपाय मला सांगा. दुसरी कोणतीही साधने असली तर ती साध्य करता येतील पण ही सहिष्णुता मात्र मनात भरत नाही. याकरिता तशा प्रकारचीच शांती मला प्राप्त होईल अशी कृपा खरोखर करावी. असे म्हणून उद्धवाने स्वतः भक्तिभावाने श्रीकृष्णाचे चरण
धरले.
ही उध्दवाची विनंती ऐकून कृपामूर्ति श्रीकृष्णाला मोठा संतोष झाला आणि चातकाच्या तृषेसाठी मेघ जशी गर्जना करून त्रिभुवनाला पर्जन्यवृष्टीने तृप्त करितो त्याप्रमाणे भक्ताची विनंती ऐकल्याबरोबर आनंदित झालेला श्रीकृष्ण उद्धवाच्या अंतःकरणावर शांतीचा ठसा उमटवेल. ब्रह्मज्ञानाची अखेरची स्थिती म्हणजेच मुख्यत्वेकरून शांती होय. उदार, सुंदर व गुणगंभीर असा शार्ङ्गधर आता शांतीचे भांडार खुले करून स्वतः उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर देईल. श्रीकृष्णाची सांगण्याची पद्धत आश्चर्यकारक असेल. युक्ति व चातुर्य यांचे जणू काय ते वैभवच. ज्यामुळे जेणेकरून आपोआपच शांती प्राप्त होईल अशी अपूर्व युक्ति तो सांगेल. श्रीकृष्णाच्या मुखातील ज्ञानपूर्ण शब्द ऐकून शांती स्वतःच मूर्तिमंत प्रगट होईल. तेव्हा भगवंतांचे भाषण ऐकायला उद्धवही मनामध्ये सावध होऊन बसला.
हे ‘भिक्षुगीता’ चे निरूपण श्रीकृष्ण पुढल्या अध्यायामध्ये करतील आणि ज्याच्या योगाने अंतःकरणात परिपूर्ण शांती बिंबते त्याचे लक्षण सांगेल. ज्यांना परमार्थाची इच्छा असेल, त्यांनी इतर साधनांची द्वारे सोडून देऊन या शांतीसाधनावरच दृढतर मोठी श्रद्धा ठेवावी. भगवंत आणि उद्धव यांच्यातील बोलणे ऐकून, भागवत कथा सांगणारे शुक्राचार्यही आनंदाने डोलू लागले आणि कथा ऐकणाऱया परीक्षितीला म्हणाले, राजा! सावध हो.
उद्धवावर श्रीभगवान् प्रसन्न झाले आहेत. शांती आणि निवृत्ती ह्यांचेच निरूपण ते आता पुढील चार अध्यायात करतील. हे पांडवकुलदीपका! हे कौरवकुलातील कुलतिलका! ऐक. तू आत्मसुखाचा साधक आहेस म्हणून खरोखर शांतीचा अधिकारी तूच आहेस.
ब्रह्मप्राप्ती साध्य करण्याकरिता तू जलपानही सोडून भागवतकथाश्रवणाला बसला आहेस. याकरिता हे सज्जना! श्रीकृष्णांनी सांगितलेली शांती आणि निवृत्ती ऐक. पुढील अध्यायात दुर्जनांनी जर मन क्षुब्ध केले, तर त्या मनाला पूर्णपणे क्षमा प्राप्त होईल असा मार्ग श्रीकृष्ण सांगतील.
अध्याय बाविसावा समाप्त