प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बागलकोट जिह्यातील तिम्मापूर येथील रण साखर कारखान्याच्या कर्मचाऱयाला कामावरून कमी करण्यात आले आहे. याचबरोबर या साखर कारखान्यामध्ये 270 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आंदोलन करण्यासाठी शेतकरी तसेच कामगार गेले असता त्यांच्यावर दडपशाही केली जात आहे. तेंव्हा आता तुम्हीच न्याय द्या, अशी मागणी बागलकोट येथील या साखर कारखान्याच्या कर्मचाऱयांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे.
बागलकोट जिह्यातील हा साखर कारखाना अत्यंत उत्तमरित्या सुरू असताना कारखान्याचे चेअरमन आणि इतरांनी भ्रष्टाचार केला. त्यामुळे हा कारखाना बंद पडला आहे. सर्व संचालक मंडळ गुंडागिरी करत आहे. कामगारांना धमकी देत आहे. आंदोलन केला तर जीवे मारु, अशी धमकी दिली आहे.
याचबरोबर शेतकऱयांची बिले देखील दिली गेली नाहीत. कामगारांना आणि शेतकऱयांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून तातडीने या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारने हा साखर कारखाना ताब्यात घ्यावा, तसेच या कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त नजमा एम. पिरजादे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष ईरणगौडा पाटील, संघटनेचे सचिव प्रकाश कब्बूर, चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक, सिद्धगौडा मोदगी यांच्यासह कामगार व शेतकरी उपस्थित होते.