मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार, कुंकळ्ळीत प्रथमच हुतात्मा दिन शासकीय पातळीवर साजरा
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळीत पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध झालेला लढा हा सर्वश्रेष्ठ लढा असून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोवाच नव्हे, तर देशातील आणि आशिया खंडातील हा पहिला लढा आहे. आपला देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणाचे महान कार्य त्या महानायकांच्या त्यागातून घडले. गोव्याच्या स्वातंत्र्याला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर का होईना या लढय़ाची नोंद आता सरकार दरबारी झाली आहे. यापुढे 15 जुलै हा दिवस जसा राज्यात शासकीय पातळीवर साजरा केला जाईल तसाच तो राष्ट्रीय पातळीवरही कायमचा साजरा केला जाणार असून हीच त्या शूरवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळीत बोलताना सांगितले.
कुंकळ्ळीत यंदा प्रथमच शासकीय पातळीवर 15 जुलै हा हुतात्मादिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जोडूनच कुंकळ्ळी नगरपालिका, कुंकळ्ळी महाविद्यालय व चिफ्टन स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सकाळी येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहिली. त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार युरी आलेमाव, कदंब महामंडळाचे अध्यक्ष असलेले आमदार उल्हास तुयेकर, डीजीपी जसपाल सिंग, चिफ्टन स्मारक समितीचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन, कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक यांनी तसेच इतर मान्यवरांनीही स्मारकावर पुष्पांजली वाहिली.
वरील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोव्यातून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व स्वातंत्र्यसैनिक रोहिदास देसाई तसेच अन्य मान्यवर दिल्लीत आदरांजली वाहण्यात सहभागी झाले आहेत, याकडे लक्ष वेधले. कुंकळ्ळीच्या या ऐतिहासिक लढय़ाची माहिती पुढे आली पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत देशभरातून अनेक जण सहभागी झाले होते. पत्रादेवी येथे अनेक जण हुतात्मे झाले. स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके ही त्यागाची प्रतीके असून तरुण पिढीसाठी त्यांची आठवण ज्वलंत ठेवणे आवश्यक आहे. म्हणून पत्रादेवी येथील स्मारक तसेच हिरवे गुरुजींचे स्मारक आणि आता पिंटो यांचे स्मारक सुशोभित करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले.
भव्य स्मारक उभारावे : फळदेसाई
यावेळी बोलताना समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांनी कुंकळ्ळीतील लढा हा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून सरकारने कुंकळ्ळीतील स्मारकाचे भव्य बांधकाम करावे, अशी मागणी केली. तसेच हा इतिहास नवीन पिढीपुढे चित्रपटनिर्मितीद्वारे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीच्या पहिल्या लढय़ाची सरकारने दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांचे अभिनंदन केले. तसेच आलेमाव यांनी कुंकळ्ळीत चाललेल्या प्रदूषणाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याशिवाय त्यांनी सुसज्ज इस्पितळाची मागणी केली. मोपा विमानतळासाठी जमिनी गेलेल्यांना नोकऱया देण्याचे जसे आश्वासन सरकारने दिले आहे त्याच पद्धतीने कुंकळ्ळीतील नागरिकांना एनआयटीमध्ये नोकऱया उपलब्ध कराव्यात, अशीही मागणी आलेमाव यांनी केली.
पुरस्कारांचे वितरण
यावेळी चिफ्टन स्मारक समितीतर्फे देण्यात येणारे पुरस्कार मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यात कुंकळ्ळी भूषण पुरस्कार माजी मंत्री आरेसियो डिसोझा यांना, तर माजी आमदार राजन नाईक यांना कुंकळ्ळी श्री पुरस्कार आणि मिनिनो डायस, फुटबॉल खेळाडू प्रेडी मास्कारेन्हस, टिलरॉय फर्नांडिस यांना कुंकळ्ळी ज्योती पुरस्कार बहाल करण्यात आला. कुंकळ्ळीतील पहिल्या लढय़ात बलिदान दिलेल्या महानायकांचा याप्रसंगी मरणोत्तर गौरव करण्यात येऊन त्यांच्या वारसदारांना मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सन्मानपत्रे देण्यात आली. ती सन्मानपत्रे ऑस्कर मार्टिन, नीरज आगियार, विदेश देसाई, श्रीपाद देसाई, लेविन्सन मार्टिन, भिकू देसाई, संदीप देसाई, देवेंद्र देसाई, विशाल देसाई, सॅमी तावारीस, लार्सन आल्मेदा, वेंडी मास्कारेन्हस, दिलीप देसाई, गौरीश फडते देसाई व विजयकुमार कोप्रे देसाई यांनी स्वीकारली.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंत्री फळदेसाई व आमदार तुयेकर यांच्या हस्ते व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच पदवी परीक्षांत आणि दहावी व बारावी परीक्षांत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजयकुमार कोप्रे देसाई यांनी केले. स्वागत विदेश देसाई यांनी केले. सुरुवातीला विद्यार्थी पथकांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत
पोर्तुगीजांच्या वसाहतवादाचा आम्हीही मुकाबला करू शकतो हे महानायकांनी दाखवून दिले. देव, धर्म, देशासाठी आपल्या प्राणाची त्यांनी आहुती दिली. हा ऐतिहासिक दिवस शासकीय पातळीवर साजरा होण्याची मागणी आज पूर्ण होत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आम्ही साजरा करत आहोत व गोव्याच्या मुक्तीची 60 वर्षे आपण साजरी केली आहेत. महानायकांच्या बलिदानातून 1583 साली धर्मांतर थांबले, तरी अजून धर्मांतराचे प्रकार घडत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे बोलताना दिला.