पुढचे चार दिवस पाऊस मंदावणार
पुणे / प्रतिनिधी :
मागच्या आठ दिवसांपासून राज्याला सडकून काढणाऱ्या पावसाचा जोर आता काहीसा ओसरला आहे. पुढच्या चार दिवसांत कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात पावसाची स्थिती साधारण मंदावलेलीच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पुढच्या 24 तासांकरिता कुठेही अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला नाही.
यंदाच्या वर्षी जूनमध्ये पावसाने ताण दिला. तर जुलैचे दोन्ही आठवडे पावसाने व्यापून टाकले. त्यामुळे राज्य जलमय झाले असून, अनेक धरणांतील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसत आहे. शुक्रवारी कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांत पावसाची नोंद झाली. तथापि, कुठेही अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले नाही.
पुणे व शहर परिसरात मागच्या दहा दिवसांत सूर्यदर्शन होऊ शकले नव्हते. मात्र, शुक्रवारी सूर्यकिरणांचे ओझरते दर्शन नागरिकांना झाले. पुण्यात सतत कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली असून, अधूनमधून सरी पडत असल्याचे दृश्य पहायला मिळाले. अन्य जिल्हय़ांतही हेच चित्र दिसत होते. पुण्यात सायंकाळी पाचपर्यंत 4.3, कोल्हापूर 14, महाबळेश्वर 83, डहाणू 40, नाशिक 8, सातारा 5, सांगली, रत्नागिरी 3, मुंबई 5, नागपूर 2, तर वर्ध्यात 4 मिमी पावसाची नोंद झाली. तर पणजीमध्ये 4 मिमी पावसाची नोंद झाली.
पुढच्या चार दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात शनिवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर शनिवारपासून मंगळवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल. मराठवाडा व विदर्भाच्या बऱ्याच भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ात मेघगर्जनेसह, तर विदर्भात मुसळधार पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही पाहा : संविधान बदलण्याचं पाप केंद्र सरकार करत आहे