पुणे / प्रतिनिधी :
अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण करून विरोधकांना महाराष्ट्र जिंकता येणार नाही. छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या राज्यात तुष्टीकरण वा लांगूलचालनाचा ‘कर्नाटक पॅटर्न’ कदापि यशस्वी होणार नाही. महाराष्ट्रात फक्त शिवरायांचा व मोदींचा पॅटर्न चालणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा होते. या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते. या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे यांनी कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.
फडणवीस म्हणाले, कर्नाटकातील यशामुळे काही मंडळींना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या आहेत. आता राज्यातही कर्नाटकचा फॉर्म्युला राबविण्याची योजना आखली जात आहे. मात्र, तुमचा कर्नाटक फॉर्म्युला राज्याच्या लोकसभेत, विधानसभेत यशस्वी होणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील मावळय़ांना देव, देश, धर्मासाठी कसे लढायचे, हे माहीत आहेत. अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण करून तुम्हाला या मातीत जिंकता येणार नाही. तुष्टीकरण, लांगुलचालनचा कर्नाटक पॅटर्न या भूमीत चालणार नाही. राज्यात केवळ मोदी पॅटर्न, शिवरायांचाच पॅटर्न चालेल.
कर्नाटकात भाजपाने 7 जागा 700 पेक्षा कमी अंतराच्या फरकाने गमावल्या. तर 42 जागा पक्षाला 4 ते 5 पाच हजारांच्या फरकाने गमवाव्या लागल्या आहेत. असे असले, तरी लोकसभेत हा ट्रेंड कायम राहणार नाही. उलट 28 पैकी 25 जागा भाजपा कर्नाटकात जिंकेल, असा विश्वास व्यक्त करतानाच उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने अभूतपूर्ण यश मिळविले आहे. मुस्लिम बहुल देवबंदमध्येही आपली सत्ता आली आहे. पुढची लढाई ही बूथची असेल. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
एका सेनेने विचारांसाठी सरकार सोडले, तर दुसऱया सेनेने सत्तेसाठी विचार सोडले. भाजपा व सेनेची युती भक्कम आहे. त्यामुळे मनपा, जि. प., लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सामान्यांच्या विकासाच्या नॅरेटिव्हवर निवडून येऊ. अर्थात हा काळ सक्रियतेचा आहे. कुठलीही लालसा न बाळगता पुढचे वर्षभर पक्षासाठी काम करा. त्याग करा. सध्या राज्याच्या राजकारणात नरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. हे हाणून पाडण्यासाठी सरकार व जनतेतील सेतू निर्माण करतानाच संघटनेकडे लक्ष दयावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे यांचा पोपट मेलाय
राज्यातील भाजपा व शिंदे गटाच्या सरकारवर सर्वौच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, जे लोक प्रश्न उपस्थित करत होते, त्यांची तोंडे निकालानंतरही अजून बंद झालेली नाहीत. उद्धव ठाकरे यांना पोपट मेला, हे कुणी सांगत नसावे. सेनेच्या याचिकेतील आठपैकी कुठली मागणी न्यायालयाने मान्य केली? कोणतीच नाहीच. तरीही म्हणे आमचाच विजय झाला. हे सरकार संपूर्णपणे कायदेशीर आहे. आम्ही कार्यकाल पूर्ण करूच. पण पुन्हा निवडून येऊन दाखवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
राजीनाम्यातील फरक पवारांनी ठाकरेंना दाखवून दिला
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचीही त्यांनी खिल्ली उडविली. लोक माझे सांगाती पुस्तकात पवार यांनीच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय ते लिहून ठेवले आहे. त्यामुळे आपल्याला काही बोलायची आता गरजच नाही, असा टोला लगावतानाच राजीनामा देतो नि देणे यातला फरक पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवून दिला असल्याचा चिमटाही फडणवीस यांनी या वेळी काढला.