बेळगावसह 21 विमानतळांसाठी विशेष सवलत : लँडिंग, पार्किंग, नेव्हीगेशन शुल्क माफ
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी उडान योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. बेळगावसह देशातील 21 विमानतळांवरील लँडिंग, पार्किंग व नेव्हीगेशन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बेळगाव विमानतळावरून ‘कृषी उडान’ सुरू होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱयांनी पिकविलेला कृषी माल ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचावा या उद्देशाने ‘कृषी उडान’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून विमानातून एका शहरातून दुसऱया शहरापर्यंत कृषीमाल पोहचविला जाणार आहे. भाजीपाला, फळे, दुग्धजन्य उत्पादने, कृषी उत्पादने अत्यल्प दरात विमानाने वाहतूक करता येणार आहेत. उडान 2.0 मध्ये बेळगाव विमानतळाची निवड करण्यात आली. उडान-3 अंतर्गत बेळगावची निवड झाल्यानंतर प्रवासी वाहतूक झपाटय़ाने वाढली होती. त्यामुळे आता ‘कृषी उडान’अंतर्गत निवड झाल्याने त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
बेळगावसह देशातील आगरतळा, अगदी, बारापानी, डेहराडून, दिब्रुगढ, दिमापूर, गग्गल, कुलू, लिलाबरी, पंतनगर, रायपूर, रांची, रूपसी, शिमला, तेझू, भोपाळ, जबलपूर, जरसूगुड्डा या विमानतळांना शुल्कमाफी करण्यात आली आहे. शुल्क माफ झाल्यामुळे कार्गो वाहतुकीला चालना मिळणार आहे. कमी दरामुळे कृषी मालाची वाहतूक करणे सोयीचे ठरणार आहे.
बेळगाव जिल्हा कृषी मालाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. जिल्हय़ात ऊस, कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहू, ज्वारी यासह झेंडू, जरबेरी, शेवंती ही फुले, केळी, आंबा, दाक्ष, पेरू या फळांचे उत्पादन होते. तसेच दुग्ध उत्पादनातही जिल्हा अग्रेसर असल्याने या क्षेत्रांना ‘कृषी उडान’ योजना महत्त्वाची ठरणार आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘कृषी उडान’ला सर्वतोपरी सहकार्य
शेतकऱयांचा कृषीमाल विमानाने इतरत्र जावा व त्याला योग्य तो मोबदला मिळावा, या उद्देशाने ‘कृषी उडान’ योजना आखण्यात आली आहे. बेळगावमधील उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून ‘कृषी उडान’ योजना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. स्थानिक चेंबर ऑफ कॉमर्स, एपीएमसी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार आहे.
– राजेशकुमार मौर्य (विमानतळ संचालक)