स्त्रियांनी कोणते वस्त्र वापरावे आणि शरीराचा कोणता भाग झाकावा याबाबत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱया मंडळींना चपराक देण्याचे काम इराणसारख्या कट्टरवादी देशातून होऊ शकेल असा विचारही कोणी केला नसेल. मात्र अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात तेव्हाच आवाज उठतो, जेव्हा आपल्या पारतंत्र्याची जाणीव प्रकर्षाने अन्यायग्रस्त घटकाला होऊ लागते! त्या विरोधात बंड केले पाहिजे असे जेव्हा त्यांचे मन ठरवते तेव्हा समोर बंदूक आहे की तोफ याचा विचार न करता लोक बंडाला तयार होतात. हिजाब घातला नाही या कारणासाठी सरकारने नेमलेल्या सामाजिक पोलिसांच्या तक्रारीवरून महसा अमिनी नावाच्या 23 वषीय युवतीला इराणमध्ये पोलीस कोठडीत अमानुष मारहाण झाली. या अमानुष मारहाणीमुळे तिला मृत्यू पत्करावा लागला. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहणाऱया लोकांनी याबाबत देशाला माहिती दिल्याने संपूर्ण देशात हिजाब आणि सरकारी दबावाविरोधात वातावरण निर्माण झाले. असंख्य महिलांनी बुरखा जाळून, समाज माध्यमांवर केस कापल्याचे व्हिडिओ जारी करून आपला निषेध नोंदवला. अनेक मुलींचे पालकसुद्धा या आंदोलनात उतरले आणि देशात ठिकठिकाणी विरोधात खुली निदर्शने होऊ लागली. भारतात विशेषतः कर्नाटकात हिजाब वाद चिघळला होता. त्यामुळे त्या पट्टय़ात या इराणी स्त्रियांच्या बंडाचे कौतुक नक्कीच होईल. ते झालेही पाहिजे. पण त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो याचाही विचार गरजेचा आहे. आपण या प्रश्नाकडे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाहतो का? हा विचार करणेही आवश्यक आहे. एखाद्या स्त्रीने बुरखा सक्तीने किंवा परंपरेचा भाग म्हणून वापरणे आणि उन्हाच्या त्रासापासून बचावासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वापरणे यात फरक आहे. गणवेशाचा नियमही याहून वेगळा. पण, जर एखाद्या व्यक्तीचे विचार पुरुष उत्तेजित होऊन गुन्हा घडवतील म्हणून टंच कपडय़ाऐवजी पूर्ण शरीर झाकेल असाच पेहराव हवा अशा पध्दतीचे असतील तर हिजाबबद्दल त्याने व्यक्त केलेले विचार हे दुग्गलबाजीच ठरवले पाहिजेत. कारण हे समर्थनच देशात कट्टरता वादाला खतपाणी घालून देशाला गुलामगिरी किंवा हुकुमशाहीकडे नेत असतात. 1979 सालापूर्वी इराण एक सुधारलेले राष्ट्र होते. रशियाच्या मदतीने आणि स्वतंत्रपणे त्यांनी प्रगती केली होती आणि धार्मिक दबावाशिवाय पण आपापल्या उपासना पध्दतीला जपत जगण्याची एक चांगली पद्धत त्या देशात रूढ झाली होती. स्त्रिया प्रागतिक विचाराच्या होत्या. अचानक झालेल्या बदलाने त्यांचे हक्क हिरावले गेले. अत्याचाराने विरोध मोडून काढला गेला. पण तरीही चाळीस वर्षे तिथल्या स्त्रिया त्या विरोधात चित्रपट, पत्रकारिता अशा अभिव्यक्तीच्या विविध मार्गाने व्यक्त होतच होत्या. अशा देशात धार्मिक वाद निर्माण करायचे आणि आपल्या राष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱया रशियाच्या शक्ती स्थळांना उध्वस्त करायचे या धोरणातून अमेरिकेने खोमोणी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामी कट्टर वाद्यांची एक चळवळ निर्माण केली. त्यांनी 1979 साली सत्तांतर घडवून आणले आणि एक सुधारणावादी राष्ट्र कट्टर इस्लामिक रिपब्लिक म्हणून जगात ओळखले जाऊ लागले. पण कट्टरतावाद पोसून कोणाचे भले होत नाही. अमेरिकेच्या अशा उपद्व्यापाचा फटका त्यांना ओसामा बिन लादेन सारख्या प्रवृत्तीने दिल्यानंतर ते भानावर आले. पण तोपर्यंत अमेरिकेचे प्रचंड नुकसान झाले होते. अमेरिकेच्या राक्षसी महत्वाकांक्षेचे बळी अनेक देश आणि राष्ट्रप्रमुख ठरले होते. आपली एक चूक सुधारण्यासाठी त्यांना शेकडो चुका कराव्या लागल्या आणि त्या निस्तराव्याही लागल्या. रशिया अमेरिका शीतयुद्ध आणि आपल्या स्वार्थासाठी इस्लामी कट्टरवादाला खतपाणी घालणे जगाला महागात पडेल याचा विचार त्यांनी कधी केला नाही. त्याचा परिणाम केवळ तेल संपन्न राष्ट्रांमध्ये न होता जगभर जाणवू लागला आहे. असे असले तरी कट्टरतावाद हा काही फक्त मुस्लिमांच्या मक्तेदारीचा भाग नाही. कमी जास्त प्रकारची कट्टरता जगातील सर्वच धर्मांमध्ये दिसून येऊ लागली आहे. परिणामी ज्या देशात ज्या धर्माची लोकसंख्या अधिक तो तिथे अधिक कट्टर होत चालला आहे. मूळ मानवतेच्या विचाराच्या पलीकडे जाऊन वर्चस्ववादी विचारांना धर्म आणि धर्माच्या आडून राजकारण करणारे राजकारणी बळी पडू लागले आहेत. त्यामुळे कधी श्रीलंकेत बुद्धांना हे आपले राष्ट्र आहे आणि इतरांना दुय्यम नागरिकत्व असले पाहिजे असे वाटते तर कधी भारतात हिंदू संघटना तशाच पद्धतीची कट्टरता व्यक्त करत असतात. उत्तर भारत आणि पाकिस्तानच्या पट्टय़ात आपल्या भागातील सर्वाधिक कट्टरता गेली 75 वर्षे आपण अनुभवत आहोत. भारताची फाळणी ही या कट्टरतेसाठी अधिक जबाबदार आहे असे आज सहजावरी सांगितले जात असले तरी त्याचा इतिहास हा मुस्लिम टोळय़ांनी भारतावर केलेल्या आक्रमणापासून शोधावा लागतो. अनेक शतके या भागात झालेला संघर्ष तिथल्या माणसांमध्ये कट्टरता वाढीस लागण्यास कारणीभूत असला तरी भारतातील दक्षिणेच्या पट्टय़ात तितके कट्टर धार्मिक वातावरण नव्हते. त्यामुळे दक्षिण भारताची सर्वार्थाने इतिहास काळापासून प्रगती झाल्याचे आणि एक संपन्न संस्कृती विकसित झाल्याचे आपण अनुभवतो. विशेषतः दक्षिणेच प्रवेशद्वार असणाऱया कर्नाटकात हिजाब विरोधात सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यातून जय श्री राम अशा घोषणा देत गळय़ात भगवे उपरणे अडकवून आंदोलन करणारे युवक हे चित्र, भारतीय विशेषतः हिंदू संस्कृतीचा अभिमान असणाऱया कोणत्याही सश्रद्ध व्यक्तीला पसंत पडण्यासारखे नव्हतेच. अर्थात हिजाबचे समर्थन करणे योग्य नसल्याने त्या विरोधात भूमिका मांडली गेली नाही. तरी लोकांना आंदोलनकर्त्या युवकांची भूमिका पटली असे होत नाही. प्रत्येक नागरिकाला आपला पेहराव कसा असावा याचे स्वातंत्र्य आपण मानतो. त्याचवेळी शाळा महाविद्यालयांमध्ये गणवेशाबाबत असलेले काही नियम हे धर्माच्या आधाराने डावलता येणार नाहीत ही देखील नागरिकांची स्पष्ट भूमिका असल्याने त्यांनी ना हिजाबचे समर्थन केले ना त्या विरोधातील आंदोलनाचे. न्यायालयीन निकालाने हा विषय संपला.
Previous Articleमी सर्वांच्या हृदयामध्ये रात्रंदिवस राहतो
Next Article चिलीमध्ये जगातील सर्वात जुना वृक्ष
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.