ऑनलाईन टीम / तरुण भारत :
औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) औरंगाबादच्या नामांतराविरोधात मोठा लढा उभारण्याच्या तयारीत असून, औरंगाबादेत होणाऱ्या जी 20 परिषदेदरम्यान आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना जलील म्हणाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने या निर्णयाला मंजूरी दिली. पण आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहोत. हा आमचा जिल्हा आहे, कोणाच्या बापाचा नाही. त्यामुळे कोणीही उठेल आणि आमच्या जिह्याला नाव देईल, हे खपवून घेणार नाही. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी एमआयएम रस्त्यावर उतरेल.
अधिक वाचा : सात जणांच्या हकालपट्टीमुळे 50 मनसैनिकांचे राजीनामास्त्र
औरंगाबादेत होणाऱ्या जी 20 परिषदेदरम्यान आम्ही आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनातून मी जगाला दाखवून देईन की, हे किती घाणेरडे राजकारण करत आहेत. ज्यांचे नाव शहराला दिले, त्यांचा दर्जा शहराला देणार आहे का? नाव बदलून शहरांचा विकास होणार आहे का? आठ दिवसांनी मिळणारे पाणी उद्यापासून दोन वेळा मिळणार आहे का? म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मला दु:ख आहे.