आमदार सतेज पाटील यांची मागणी : ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची गरज
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे मेन राजाराम हायस्कूल बंद करण्याचा निर्णय घेऊ नये. याबाबत पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सर्वांगिण चर्चा करणे अपेक्षित आहे. अन्यथा शहरातील नागरिकांतून या निर्णयास तीव्र विरोध होईल असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघ अंबाबाई मंदिर परिसरात आहे. त्यामुळे भाविकांना सेवा, सुविधा पुरविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने राजाराम हायस्कूलऐवजी संघाची जागा ताब्यात घ्यावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.
अजिंक्यतारा कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत हेते. शहराच्या मध्यवस्तीत असलेले व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले जिल्हा परिषदेचे मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरीत करून तेथे यात्री निवास बांधले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हे हायस्कूल बंद करणार नसल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले असले तरी मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये हायस्कूल स्थलांतरीत करता येईल काय ? याबाबत अद्याप चाचपणी सुरु आहे. त्यामुळे या शाळेचे ऐतिहासिक स्वरुप नष्ट होणार आहे. याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, राजाराम हायस्कूल स्थलांतरीत करू नये. ही जागा यात्री निवाससाठी न घेता अन्य ठिकाणी जागेची उपलब्धता करता येईल काय ? याबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सर्वांगिण चर्चा करणे आवश्यक आहे.