स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत देशाला नाजूक स्थितीला सामोरे जावे लागत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेत्तृत्वाची जी बैठक नुकतीच पार पडली त्याने सीमेवरील वाढत्या संकटांची भीती अजूनच गडद केलेली आहे. चीनचे सर्वोच्च नेते शी जीन पिंग हे जगाला युद्धाच्या खाईत लोटू शकतात अशी भाकिते बराच काळ होत असतानाच त्यांना सत्ता आता अजून पाच वर्षे लाभणार आहे असे दिसत आहे. एखादेवेळेस त्यांना तहहयात नेतृत्व मिळू शकते. माओनंतर एव्हढी सत्ता स्वतःच्या हातात एकवटणारे ते एकमेव चीनी नेते आहेत.
2020च्या जून महिन्यात गलवान या लडाखमधील सीमाभागात भारतीय आणि चीनच्या फौजात मोठी चकमक उडाली होती. त्यात चीनचे बरेच नुकसान झाले होते आणि त्याचे भरपूर सैनिकदेखील मारले गेले होते. 21 भारतीय जवानांना या चकमकीत वीरगती प्राप्त झाली होती. शी यांनी बीजिंगमध्ये झालेल्या या बैठकीत या चकमकीची क्लिप दाखवून भारतच कसा आक्रमक होता असा कांगावा केला आहे. एव्हढेच नव्हे तर या लढाईत चीनला यश प्राप्त झाले होते असा दावा केला आहे. देशाच्या सीमेवर कोणी आगळीक केल्यास चीन अजिबात चूप बसणार नाही असा संदेश देत त्यांनी भारताला आक्रमक ठरवण्याचा प्रयोग केलेला
आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायासमोर चीनचा हा प्रयत्न किती यशस्वी अथवा अयशस्वी ठरणार हा भाग वेगळा पण शी यांच्या नेतृत्वाखाली बीजिंगमध्ये वाढती आक्रमकता येत आहे. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना तो ‘वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार’ असा स्पष्ट संदेश या बैठकीतून दिला गेलेला आहे. चीनबरोबरील भारताच्या असलेल्या विशाल सीमेवर ठिकठिकाणी त्याच्याकडून आगळिक तरी काढली जात आहे नाहीतर भारतीय भूभागात घुसखोरी वाढत आहे त्याला आळा बसणार नाही हे त्यातून स्पष्ट होत आहे. भारताला डोळय़ात तेल घालून सीमेचे रक्षण केले पाहिजे हे कटू सत्यच त्यांनी अधोरेखित केलेले आहे.
शी हे प्रकरणच वेगळे आहे. तसेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे आहे. शी यांना माओसारखा थोर लोकोत्तर नेता बनायचे आहे. जगात सर्वात जास्त चांगली राजकीय प्रणाली ही चीनमध्ये राबवला जाणारा आगळा समाजवाद होय. त्यामुळे अमेरिका आणि भारतासह सर्वच देशांच्या शासनव्यवस्था या तकलादू आहेत असे चीनच्या लोकांना भासवले जाते. त्यामुळे भारतासारखे देश यशस्वी होणार नाहीत याकरता सर्व प्रकारच्या हिकमती लढवल्या जातात.
सोविएत संघाचे विघटन झाल्यापासून रशियादेखील दुबळा झालेला आहे. त्यात तेथील राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी शेजारील युपेनशी युद्ध पुकारल्यापासून रशिया हा एक प्रकारे चीनचा मांडलिकच झाला आहे. अमेरिकेने लागू केलेल्या निर्बंधांमुळे तेलाचे उत्पन्न मिळवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर रशियाला चीनवर अवलंबून राहावे लागत आहे. एकेकाळी जेव्हा अमेरिकेचे सातवे आरमार भारताला धमकावू लागले होते तेव्हा सोविएत संघ हा भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. बांग्लादेशच्या निर्मितीचा तो काळ होता. आता रशिया पूर्णपणे बदलला आहे. तो चीनच्या बाजूचा झालेला आहे. भारत-चीनने झगडा आपापसात बोलणी करून सोडवावा असे तो म्हणत आहे. चीन जगात कोणाचेच ऐकायला तयार नाही भारताचे कुठले ऐकतो?
जगात अमेरिकेनंतर चीन हा नंबर दोनची आर्थिक महासत्ता झालेला आहे. म्हणून जागतिक पातळीवर आपले वर्चस्व इतरांनी मानावे अशी त्याची अपेक्षा आहे. चीन ही ‘जगाची फॅक्टरी’ बनला असल्याने अमेरिकेसह साऱया राष्ट्रांना त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या वस्तू अथवा सेवा करता अवलंबून राहावे लागत आहे. चीनची आर्थिक ताकद ही भारतापेक्षा कैकपटीने जास्त असल्याने भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार असे आपल्या शेजारील देश चीनच्या दबावाखाली तरी आहेत अथवा त्याच्या कछप्पी लागलेले आहेत. आर्थिकदृष्टय़ा दिवाळखोर झालेला श्रीलंका हा चीनच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे. बांगला देशाबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत त्यात बिब्बा घालण्यासाठी चीन कामाला लागला आहे.
भारताच्या हद्दीत वारंवार घुसखोरी करण्याच्या चीनच्या खोडय़ा एकीकडे वाढत असताना भारताचा त्याच्याबरोबर व्यापारदेखील वाढत चालला आहे असं विचित्र चित्र दिसत आहे. चीनकडूनची आपली आयात ही त्याच्या आयातीच्या मानाने खूपच जास्त आहे. आत्मनिर्भर भारताची घोषणा देऊनदेखील चीनवरील अवलंबित्व भारत कमी करू शकत नाही हे वास्तव आहे. दिवाळी साजरी करत असताना लावले जाणारे रोषणाईचे दिवे बहुतांशी चीनमधूनच आयात होतात. भारतातील काही उद्योजक स्वतः उत्पादन करण्याच्याऐवजी चीनमधून स्वस्त दरात वस्तू आणून येथे आपला ठप्पा मारून विकतात म्हणून ही व्यापारातील दरी रुंदावत आहे.
आर्थिकदृष्टय़ा अतिशय संकटात सापडलेला पाकिस्तान तर चीनचा मोठा हस्तक बनलेला आहे. येनकेनप्रकारेण भारताला कसा त्रास देता येईल याचे नियोजन ही अमंगळ युती नेहमी करत असते. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडेन हे पाकिस्तानकडील अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत ती कोणाच्याही हाती लागू शकतात अशी भीती व्यक्त करताना दिसतात तर दुसरीकडे त्यांचेच सरकार पाकिस्तानला अत्याधुनिक लढाऊ विमाने देत आहे. पाकिस्तानला दिलेली शस्त्रास्त्रे शेवटी भारताच्या विरोधात वापरली जातात हा अनुभव असला तरी अमेरिकेला त्याची पर्वा नाही. त्याला पैसे कमवायचे आहेत. भारताकडून काही काम काढायचे असेल तर फक्त ती जगातील सगळय़ात मोठी लोकशाही अशी भलावण करत मधाचे बोट लावावयाचे. सगळे तात्पुरते, व्यवहारापुरते. मग गरज सरो वैद्य मरो.
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट ही पाकिस्तानच्या सल्ल्याने चालत असल्याने ती एक वाढती डोकेदुखी भारताला झाली आहे. इराणमधील राजवट ही अतिशय संधीसाधू म्हणून ओळखली जात असल्याने भारताची पूर्वापारची मैत्री बाजूला ठेवून तिने चीनशी दोस्ती वाढवली आहे. हिंद महासागरात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर भारत Quad या संघटनेचा सदस्य बनलेला आहे त्यावरून चीनचा जळफळाट वाढला आहे. तैवान हा देश आपलाच भाग आहे असा दावा करत चीनने वेळ पडली तर तो मिळवण्यासाठी आपण युद्धाचा मार्गदेखील पत्करू असे जाहीर करून या महासागरातील नजीकच्या देशांची काळजी वाढवली आहे.
जगात आपणच आणि आपली व्यवस्थाच चांगली हे चीनी नागरिकांना पटवून देण्यासाठी शी सारख्या नेत्यांना भारतासारख्या देशांना वचपा दाखवायचा आहे. अशावेळेला चिनी ड्रगनशी भावी काळात कसा सामना करावयाचा हा भारतापुढे मोठा प्रश्न आहे. आपण फार थोर झालो आहोत आणि आपल्यापुढे बाकी सारे ‘किस झाड की पत्ती है’ असे मानणे शहाणपणाचे ठरणार नाही. जोपर्यंत भारत सर्वाथाने समर्थ होत नाही तोवर चीनची तलवार वेगवेगळय़ा प्रकारे आपल्यावर टांगतीच राहणार आहे.
2050 पर्यंत जगातील एकमेव महासत्ता चीनला बनायचे आहे. भारताला स्वबळावरच पुढे यायचे आहे. लढावयाचे आहे. कोणीच आपले नाही. रात्र वैऱयाची आहे. ‘जागते रहो’, हाच आता एकमेव नारा असला पाहिजे.
सुनील गाताडे