कोल्हापूर/संग्राम काटकर
एकेकाळी 108 तळ्यांनी पाणीदार राहिलेल्या कोल्हापूरला हेमाडपंथी पद्धतीच्या मंदिरांचाही इतिहास लाभला आहे. दगडी शिळांमध्ये बनवलेली ही मंदिरे कोल्हापूरकरांसह परगावच्या लोकांचे श्रद्धास्थान असून ती त्या त्या भागांची ओळखही बनली आहेत. बिनखांबी गणेश मंदीराजवळील रंकभैरवाचे आणि उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिर हे त्यापैकीच एक मंदिर. करवीर महात्म्यात उल्लेख असलेल्या या मंदिरांना वर्षानुवर्षे रंगरंगोटी केली जात होती. रंगांनी मंदिरे उठावदार दिसली असले तरी त्यांचे मुळस्वरुप झाकले गेले. त्यावर कल्पना करण्यापलीकडे रंगाचा थर बनला. तो काढला जावा अशी चर्चा व्हायची. पण कृती होत नव्हती. मंदिरांजवळील तरुणांनी पुढाकार घेत मंदिरांचा पुर्वापार रंग श्रमदान करुन हटवला. त्यामुळे या दोन्ही मंदिराचे मुळस्वरुप नव्या पिढीसमोर आले आहे. उत्तरेश्वर महादेव मंदिरातील तर विशाल शिवलिंगावरील दीड इंचांचा रंग हटवून वज्रलेपही करुन नवसंजीवनी देण्याचे कौतुकास्पद काम झाले आहे.
रंकभैरव मंदिर
रंकोबा तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन करवीर क्षेत्रपाल रंकभैरव मंदिर रंगमुक्त करत मुळ स्वरुपात उजेडात आणले आहे.
बिनखांबी गणेश मंदिराजवळ हाकेच्या अंतरावर करवीर क्षेत्रपाल रंकभैरव मंदिर आहे. ते अंबाबाई मंदिराच्या समकालीन आहे. रंकभैरव मंदिराच्या पालखी सभागृहाला काळ्या पाषणाचे सुमारे 40 नक्षीदार खांब आहेत. मंदिरात पाषाणातच घडवलेल्या रंकभैरवाच्या दोन फुटी मूर्ती आहेत. पूर्वीपासून उठावदारपणासाठी मंदिराच्या अंतरंगासह खांबांना विविध रंगांनी रंगवले गेले. प्रत्येक वर्षी नवरात्रौत्सव आणि रंकभैरव उत्सवावेळी मंथ्रि रंगवले गेले. कालांतराने सातत्याच्या रंगकामामुळे मंदिराचे अंतरंग व खांबांवर रंगांचा थरच चढला. या थरामागे प्राचीन कलाकुसर झाकली गेली. याकडे रंकोबा तालीम मंडळाचे लक्ष गेले. तालमीचे राहुल जप्तनमुलुख-जाधव, संदीप जाधव, योगेश गुरव, बाळ डवरी व बापू डवरी यांच्या नेतृत्वाखाली 20 तरुणांनी मंदिराचे अंतरंग व खांबांना रंगमुक्त करण्याचे पक्के करुन त्यानुसार कृती केली. या तरूणांनी दीड महिना परिश्रम घेत खांबांवरील रंग काढून टाकला. वॉटर जेट मशीनने मंदिर स्वच्छ केले. त्यामुळे मंदिराचे प्राचीन सौंदर्य प्रकाशात आले आहे.
उत्तरेश्वर महादेव मंदिर
उत्तरेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाला वज्रलेप करून नवसंजीवनी दिली. शिवाय मंदिराच्या गाभाऱ्यासह बाहेरील भिंतींना दिलेला रंगही काढण्यात आला आहे.
शहराच्या चौहोबाजूंनी महादेव मंदिरांचे अधिष्ठान आहे. उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिर हे त्यापैकीच एक. प्राचीन वारसा लाभलेले हे मंदिर उत्तरेश्वर पेठेसह अनेकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात विशाल शिवलिंगाबरोबर देवी पार्वती, गणपती व नंदी तर शिवलिंगासमोर 11 मारुतींच्या मूर्ती आहेत. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक सोमवारी गर्दी असते.न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मंदिर या परिसरात राहत होते. त्यांच्याच नावाच्या ट्रस्टकडून उत्तरेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी नगरपालिकेला प्रत्येक वर्षी देणगी मिळू लागली होती, असा इतिहास आहे. तत्कालीन भाविकांकडून मंदिर रंगवले जात होते. शिवलिंगाला श्रावणापूर्वी व महाशिवरात्रीवेळी रंगवले जाऊ लागले. प्रत्येक वर्षागणिक केलेल्या रंगरंगोटीमुळे शिवलिंगावर रंगाचा दीड इंची थर तयार झाला. गाभाऱ्यासह बाहेरील बाजूच्या भिंतीवर रंगाचा थर होता. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या माजी अध्यक्ष दीपक काटकर, माजी उपाध्यक्ष मनोज घाटगे, माजी सचिव सुभाष सुर्वे आदी कार्यकर्त्यांनी हा थर हटवून हा प्राचीन ठेवा उजेडात आणण्याचे पक्के केले. एका कंपनीकडून मंदिरावरील रंग हटवण्यात यश मिळवले. जाणकारांकडून मार्गदर्शन घेऊन मुर्तीकार अरविंद वाघ यांच्याकडून शिवलिंगाला वज्रलेपही केला. त्यामुळेच शिवलिंगांसह मंदिराच्या गाभाऱ्याचे अंतरंग मुळ स्वरुपात आले. सध्या रोज श्रीपती आमले व प्रत्येक सोमवारी यशवंत नलवडे शिवलिंगाची पूजा करत आहेत.