पुणे / प्रतिनिधी :
कुस्ती हा मातीमधील रांगडा खेळ असून, राज्याचा सन्मान आहे. देशास पाहिले ऑलंम्पिक पदक हे कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांना मिळाले. आता विजयी झालेल्या मल्लांनी ऑलंम्पिकमध्ये विजय संपादन करावा. सरकार येत असते आणि जात असते. त्यामुळे खेळात कोणीही राजकारण आणू नये. सध्या पै. सिकंदर शेख याच्यावरून सुरू असलेले द्वेषाचे राजकारण चुकीचे आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या वतीने हिंदकेसरी अभिजीत कटके आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र केसरीमध्ये उपांत्य फेरीत एक डाव करण्यावरून ज्यांनी कधी अंगास माती लावली नाही, कधी लंगोट घातला नाही ते तोंडाची निष्फळ वाफ त्वेषाने सोडत आहेत. जे खेळ करतात त्यांनी त्याबाबत बोलणे उचित आहे. नुसती चर्चेची गुऱ्हाळ सुरू आहेत. मल्लांनी आखाडय़ामध्ये गाजवलेले कर्तुत्व दुर्देवाने झाकले जाते. पै. सिकंदर शेख यांच्यावरून जातीचे राजकारण सध्या सुरू आहे. खेळाडूंचा धर्म हा कुस्ती असून सिकंदर याच्यावरून सुरू असलेले द्वेषाचे राजकारण चुकीचे आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून कुस्तीला राजाश्रय मिळाला आहे.
अधिक वाचा : आघाडीतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर पोटनिवडणुकीचा निर्णय, अजित पवार यांचे स्पष्टीकरण