नाला अतिक्रमणाच्या विळख्यात : पावसाळय़ात महामार्गावर पाणी : परिसरातील जनतेचे जगणे मुश्कील : शेतकऱयांचेही अतोनात नुकसान
वार्ताहर /किणये
पिरनवाडी येथील नाला केरकचरा, झाडे-झुडुपे व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळय़ात या नाल्यातून पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्यामुळे गेली दोन वर्षे बेळगाव-पणजी महामार्गावरील पिरनवाडीनजीक पाणी येत आहे. या नाल्याची समस्या गंभीर बनली आहे. प्रशासनाचे मात्र नाल्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत.
गेली दोन वर्षे बेळगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक गावांतील संपर्क रस्त्यांवर पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. याच मुसळधार पावसात पिरनवाडी गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. बेळगाव-पणजी महामार्गावरही पाणी आले होते. यामुळे परिसरातील लोकांचे जगणे मुश्कील बनले होते. सदर नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पाणी घुसून मोठे नुकसान
खादरवाडीच्या डोंगराळ भागातून तसेच गावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर पिरनवाडी नाल्यातून पाणी तुडुंब भरून वाहते. गेल्या वेळी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, सिद्धेश्वर गल्ली, कालिका देवीनगर आदी भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले होते. यामुळे गेली दोन वर्षे येथील लोकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते.
पिरनवाडी नाल्यात केरकचरा टाकण्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिरनवाडी गावचा विस्तार झपाटय़ाने वाढू लागला आहे. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, दुकानातील टाकाऊ पदार्थ टाकण्यात येत आहेत. नाल्यात गवत, झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. त्यामुळे पावसाळय़ात नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
उद्यमबागचे पाणी याच नाल्याला
प्रशासनाकडून बेळगावला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तशी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. बेळगाव-पणजी महामार्ग उद्यमबाग ते पिरनवाडी या महामार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. महामार्गाचे कामकाज करीत असताना महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठय़ा गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, उद्यमबाग परिसरातील पाणी याच गटारींद्वारे सोडण्यात आले असून त्या पिरनवाडी नाल्याला जोडल्या आहेत, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. उद्यमबाग व जैतनमाळ परिसरातील पाणी अन्य मार्गाने वळविणे अत्यंत गरजेचे होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
नाल्याचे योग्य नियोजन आवश्यक
नाल्याचे पाणी पिरनवाडी, मच्छे व मजगाव भागातील शेतात पसरते. दोन वर्षे पाणी शेत-शिवारात जाऊन बांध फुटून गेले होते. त्यामुळे भातपीक पूर्णपणे कुजून गेले होते. शेतकऱयांना याचा फटका पुन्हा बसू नये, यासाठी नाल्याच्या योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे.
यंदाही घरांमध्ये पाणी घुसण्याची चिंता
पिरनवाडीतील नाल्यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. नाल्यात काही जणांनी अतिक्रमण केले आहे. नाल्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा यावर्षीही महामार्गावर पाणी साचून घरांमध्ये घुसण्याची चिंता आम्हाला लागून राहिली आहे. पावसाळय़ाच्या आधी सदर नाल्याची साफसफाई करावी, अन्यथा आम्हाला मोर्चा काढावा लागेल.
– नारायण मुचंडीकर
कायमस्वरुपी तोडगा काढा
मागील दोन वर्षे पावसाळय़ात अनेकांच्या घरात पाणी आले होते. यामुळे अनेकांच्या जीवनावश्यक साहित्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने आम्हा स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन आमच्या घरात यंदाही पाणी पुन्हा येणार नाही, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मान्सूनला सुरुवात होण्याच्या आधीच या नाल्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
– सुनील मंजाळकर