आरबीआय गव्हर्नर दास यांचे प्रतिपादन : 2000 च्या नोटेसंदर्भात माहिती
नवी दिल्ली
2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केली जाणार असून यासोबतच एकंदर परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.
रिझर्व्ह बँकेने चलन व्यवस्थापनांतर्गत मागील शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. तथापि, मध्यवर्ती बँकेने असेही स्पष्ट केले की ही नोटबंदी नाही आणि 2,000 रुपयांची नोट वैध चलन राहील आणि लोक पैसे देण्यासाठी वापरू शकणार असल्याची माहिती आहे.
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(सीआयआय)च्या कार्यक्रमादरम्यान याविषयी विचारले असता, दास म्हणाले की 2,000 रुपयांची नोट काढून घेण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करण्यात येणार असून यासाठी आम्ही आमचे मूल्यांकन केले आहे, असे ते म्हणाले.
मध्यवर्ती बँक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून
मध्यवर्ती बँक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि अद्याप कोणतीही मोठी समस्या समोर आलेली नाही. मंगळवारपासून सुरू झालेल्या 2,000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी अवधी दिला आहे. चलनात असलेल्या एकूण चलनात 2,000 नोटेचा वाटा 10.8 टक्के (3.6 लाख कोटी रुपये) आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलून बँक खात्यात जमा करता येतील.