विविध मागण्यांसाठी केले आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) मधील प्राध्यापक संघटनेच्यावतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी मूल्यमापनावर बहिष्कार घालण्यात आला. परीक्षांच्या मानधनात वाढ, मानधन त्वरित देणे, परीक्षा व अभ्यासक्रमाचे नियोजन करणे यासह विविध मागण्यांसाठी विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. मूल्यमापनावर बहिष्कार घालण्यात आल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची शक्मयता आहे.
आरसीयूमध्ये प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. एनईपीप्रमाणे प्रवेशासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु संघटनेची मागणी मान्य न करता विद्यार्थी इतर विद्यापीठात प्रवेश घेतील, असे कारण देण्यात आले. परीक्षा व अभ्यासक्रमाचे नियोजन नसल्यामुळे अनेक समस्या येत असल्याने नियोजन करताना संघटनेशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. 2018 पासून परीक्षा मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. एस. बी. होसमनी यांच्या शिफारसीनुसार दोन वर्षांनी मानधनात वाढ करणे गरजेचे होते. परंतु तसे न होता अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. परीक्षा कालावधीत पेपर प्राध्यापकांनाच घेऊन जावे व आणावे लागतात. त्याऐवजी त्याठिकाणी एखाद्या कर्मचाऱयाची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. परीक्षेसाठी सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित कॉलेजमधील प्राध्यापकांचीही नेमणूक करावी, एक सत्र झाल्यानंतर किमान 15 दिवस सुटी द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी मोठय़ा संख्येने प्राध्यापक उपस्थित होते.