पालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल लोकांकडून संताप
प्रतिनिधी /कुडचडे
राज्यात मान्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी विविध ठिकाणी झालेली असली, तरी कुडचडे-काकोडा पालिका परिसरात ही तयारी अर्धीच राहिल्याचे दिसून येत आहे. खास करून बाजार परिसरातील तयारी मान्सून सुरू झाल्यावर मार्गी लागणार का असा जो सवाल उठविण्यात येत होता तो आता खरा ठरण्याच्या वाटेवर आहे. यामुळे लोकांकडून कुडचडे पालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाच्या आगमनाच्या अगोदर 90 टक्के मान्सूनपूर्व कामे पूर्ण व्हायची. पण यंदा नगराध्यक्षपदासाठीच्या शर्यतीमुळे सदर कामाकडे लक्ष देण्यास नगरसेवक व नगराध्यक्षांना कदाचित वेळ मिळाला नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया लोक व्यक्त करू लागले आहेत. कुडचडे बाजार परिसरात प्रत्येक वर्षी पाणी तुंबण्याच्या घटना घडत आल्या आहेत व प्रत्येक वेळी अशा घटना घडल्यावर पालिका बैठकीत पुढील पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडायला मार्ग ठेऊ नये असे ठरविले गेलेले आहे. पण या निर्णयाची नीट अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात पालिका कामगारांना पावसात भिजत काम करावे लागलेले आहे. अशीच परिस्थिती यंदाही उद्भवणार की काय, असा प्रश्न लोक करू लागले आहेत.
कुडचडे पालिका परिसरात मान्सूनपूर्व कामे न होण्यास कारण कोण आणि याकडे संबंधित खाते व मंत्री लक्ष का देत नाहीत, असे प्रश्न लोकांकडून विचारण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वर्षी वेळोवेळी कर भरून सुद्धा व्यवस्थित सोयी कुडचडे पालिकेकडून देण्यात येत नाहीत. तसेच तक्रारी केल्याशिवाय कोणतीच कामे करण्यात येत नाहीत. याचे मुख्य कारण काय यावर उजेड टाकण्याची गरज आहे, असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे.