गॅस वाहिन्या घालण्यासाठी काढलेल्या चरीत पावसाचे पाणी : चरी बुजविण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
घरोघरी गॅसवाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी वाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र गॅसवाहिन्या घालण्यात आलेल्या टिळकवाडी परिसरात रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. पण सदर रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित करण्यात आली नाही. परिणामी वळीव पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
टिळकवाडी परिसरातील संपूर्ण रस्ते चिखलमय बनले असून ठिकठिकाणी खोदलेले खड्डे आणि चरी जैसे थै आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आणि रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आटापिटा सुरू आहे, तर दुसरीकडे समस्यांचा सामना देखील करावा लागत आहे. गॅसवाहिन्या घालण्यासाठी टिळकवाडीतील प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा चरी खोदण्यात आल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी खड्डे देखील खोदण्यात आले आहेत. गॅसवाहिन्या घालून महिना उलटला तरी चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
टिळकवाडी परिसरातील नागरिकांना वाहने पार्क करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चरीमध्ये चिखल झाल्याने वाहने रूतण्याचे प्रकार वाढले आहेत. तर घरामधून वाहने बाहेर काढताना चारचाकी वाहने अडकत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. चरीमध्ये वाहने अडकण्याच्या धास्तीने वाहनधारक डांबरी रस्त्यांवर वाहने पार्क करीत आहेत. परिणामी वाहतूक केंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.