महालक्ष्मी ग्रुप संस्थापकांची पत्रकार परिषदेत माहिती : कारखान्याला ऊस पाठविण्याचे आवाहन
वार्ताहर /खानापूर
खानापूर श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित लैला शुगर्स कारखान्याकडून 2021-22 सालातील गळीत हंगामातील 175 रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. सदर रक्कम गेल्या दोन दिवसापासून शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे, अशी माहिती महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी कारखाना स्थळावर रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हलगेकर पुढे म्हणाले, खानापूर तालुक्याचा लैला शुगर साखर कारखाना श्री महालक्ष्मी ग्रुपने भाडेतत्त्वावर घेतला असून गेल्या तीन वर्षात शेतकऱयांची बिले व्यवस्थित दिली आहेत. 2021-22 सालातील गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱयांना पहिला हप्ता 2500 रुपये खात्यावर वेळीच जमा केला. दुसरा हप्ता 175 रुपये प्रमाणे शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
कारखान्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलताना ते म्हणाले, लैला शुगर आता कागदोपत्री महालक्ष्मी ग्रुपच्या हाती आला आहे त्यामुळे यापुढील कारखान्याचे संपूर्ण कामकाज संचालक मंडळाच्या निर्णयानुसार चालणार आहे. त्यामुळे आगामी काळात कारखान्याचा विस्तार करण्यात येणार असून इथेनॉल प्रकल्प देखील राबवून शेतकऱयांना अधिकाधिक उसाचा दर देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
5 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
कारखान्याच्या 2022-23 या गळीत हंगामात 5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार कारखान्यातील सर्व व्यवस्थापन सज्ज केले असून यावषी प्रतिदिनी 4 हजार टन ऊस गाळप करण्यात येणार आहे. शेतकऱयांचा ऊस वेळेत यावा यासाठी स्थानिक व महाराष्ट्रातील जवळपास 400 ऊस टोळय़ांची व्यवस्था केली आहे. त्यासंदर्भात करारही केला आहे. शेतकऱयांनी उसाची नोंदणी कारखान्याकडे करावी व आपला ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी केले.
यावेळी व्यवस्थापक सदानंद पाटील म्हणाले, ‘लैला’ कडून वेळेत बिले, वजनात पारदर्शकता व संचालकांनी दिलेली विश्वासार्हता यामुळे कारखान्याचे गाळप व्यवस्थित सुरू आहे. गेल्या गळीत हंगामात ऊस तोडणी बिल 273 रुपयेप्रमाणे असताना त्यामध्ये 19 टक्के अधिक दर देऊन 325 प्रमाणे प्रत्येकाला ऊस तोडणी दर दिला आहे. या वषीही योग्य दर देण्यात येणार आहे. शेतकऱयांचा ऊस कारखान्याला वेळेत पोचण्यासाठी ऊस नोंदणी प्रक्रिया हाती घेऊन शेतकऱयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्व. निळकंठराव सरदेसाई यांचा कारखाना स्थळावर लवकरच पुतळा
यावेळी हलगेकर म्हणाले, माजी आमदार स्व. निळकंठराव सरदेसाई यांच्या प्रेरणेतून भागलक्ष्मी साखर कारखान्याची निर्मिती झाली. त्यामुळे त्यांची कायमची आठवण कारखाना स्थळावर राहावी करिता महालक्ष्मी ग्रुपकडून कारखानास्थळावर त्यांचा पुतळा उभारणीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी महालक्ष्मी ग्रुपचे संचालक महादेव बांदिवडेकर, सुब्राव पाटील, लैला शुगर्सचे शेतकी विभागाचे अधिकारी बाळासाहेब शेलार तसेच भरमाणी पाटील, राजू सिद्धानी आदी उपस्थित होते.