पुणे : मागील लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणणारे आता भोंग्याच्या मुद्द्याबाबत का गप्प आहेत, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून केला. तसेच कुणी आल्या-गेल्याने शिवसेनेचा विजय थांबणार नाही, असे त्यांनी भाजपाला सुनावले.
शिवसेना नेत्या, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुण्यात त्यांच्या निवासस्थानी दानवे यांनी सदिच्छा भेट घेतली, त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. दानवे म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा करिष्मा होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेना केवळ निवडणुका आल्या की काम करीत नाही तर ३६५ दिवस शिवसैनिक काम करीत असतो. त्यामुळे कुणी आल्या-गेल्याने शिवसेनाचा विजय थांबू शकत नाही.
अधिक वाचा : महाराष्ट्रात गुरुवारपासून पाऊस वाढणार
भाजपच्या येथील नेतृत्वामध्ये शक्ती नाही का? करिष्मा नाही का? ती ताकद नाही का? असा सवाल अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत उपस्थित करीत भाजपाच्या राज्यातील नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला. भाजपाबद्दल देशातील जनतेमध्ये प्रचंड चीड आणि नाराजी आहे. आगामी काळात होणार्या निवडणुकीत जनता मतदानाच्या माध्यमामधून भाजपला त्यांची निश्चित जागा दाखवेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.