वडगाव शेतकरी सुधारणा मंडळातर्फे कामाला गती : नाला पूर्ण बुजल्याने बनलेय समस्या
बेळगाव : बळ्ळारी नाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा नाला पूर्णपणे बुजून गेला आहे. याचबरोबर नाल्यामध्ये गाळ तसेच कचरा व जलपर्णी वाढली असून ते काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वडगाव शिवारामध्ये हे काम सुरू असून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वडगाव शेतकरी सुधारणा मंडळातर्फे सांगण्यात आले. बळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षी वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, धामणे, अनगोळ, मजगाव या परिसरातील शेतजमिनीतील पिके वाया जात आहेत. दरवर्षी महापूर येत आहे. परिणामी पूर्ण पिके कुजून जात आहेत. दरवर्षीच हा प्रकार घडत आहेत. त्यामुळे वडगाव येथील शेतकरी संघटनेने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे गाळ काढण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत या कामाला सुरुवात केली आहे. याबाबत सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बळ्ळारी नाल्याच्या कामाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. सध्या येथील गाळ काढण्यात आला असला तरी यापूर्वीच या कामाला सरुवात झाली असती तर बरे झाले असते, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत. वडगाव शेतकरी सुधारणा मंडळातर्फे हे काम सुरू आहे.