अध्याय बाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, आत्मा हा देहापासून अलिप्त आहे हे अनेकांना पोथ्या पुराणांचा अभ्यास करून माहीत झालेले असते परंतु त्यापासून बोध घेऊन आत्म्याला देहापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे लाखात एखाद्याला वाटते. बाकी सर्व पाप पुण्याच्या कल्पना मनात घट्ट धरून पुढील जन्माची जुळणी करून ठेवण्याच्या मागे असतात. देहात अडकलेल्या आत्म्याला ईश्वरात विलीन करण्याच्या दृष्टीने वर्तणूक करणारा लाखात एखादाच भाग्यवान असतो, त्याची वैशिष्टय़े तुला सांगतो. तो निरिच्छ असतो, स्वधर्माची जोड मिळविलेली असते, त्याच्या अंतःकरणात प्राणिमात्रांची अत्यंत दया असते आणि संत सेवेची त्याला आवड असते. तो अहिंसेचे माहेरघर असतो. त्याचे मन अद्वैतयुक्त असते. सारासार विचारांचा तो राजहंस असतो. उपनिषदांचा अर्थ ग्रहण करून तो आत्मतत्त्वाचा साधक आणि खरा भावार्थी असतो. संतचरणांवर त्याची पूर्ण भक्ति असते आणि सद्गुरूंच्या वाचनात तो रहात असतो. या सर्व वैशिष्टय़ांमुळे माझ्या कृपेने ह्याच देहात तो विदेहता पावतो पण मुक्त पुरुष संसारामध्ये फार असत नाहीत. सारे जग धुंडाळावे तेव्हा कदाचित् एखादा दृष्टीस पडला तर पडतो परंतु तसा जरी दृष्टीस पडला, तरी त्याला ओळखणारा कोण आहे? कारण, उद्धवा! तेथेसुद्धा खरोखर आत्मा हा दिसत नाहीच. ज्ञानसंपन्न मनुष्य जरी अगदी जवळ येऊन भेटला आणि त्याचा देह प्रपंचात वागताना दृष्टीस पडला, तरी आतील आत्मा काही कधी कोणाला मुळीच दिसत नाही.
आत्मा गेला-आला असे म्हणतात पण त्याचे जाणेयेणे कोणी पहात नाही आणि पाहणार तरी कसे? कारण आत्म्याला खरेखुरे येणेजाणे मुळी नसतेच. यावरून देहालाच जन्ममरण आहे आणि देहालाच येणेजाणे आहे असे सिद्ध होते. अर्थातच देहाचे जाणेयेणे व आत्म्याचे स्थिर असणे हे पाहणारा तिसरा कुणीतरी द्रष्टा किंवा साक्षी आहे हे निश्चित! अन्यथा देहाचे जन्ममरण व आत्म्याचे अमरत्व लक्षातच आले नसते. हा तिसरा कुणीतरी या सगळय़ाचा साक्षीदार असतो. तो फक्त हे पहात असतो. त्या सर्व प्रकारात तो कोणताही हस्तक्षेप करत नाही. ज्याप्रमाणे पर्वतावरील वृक्षाच्या वाढीचा पर्वत हा केवळ साक्षी असतो. तो निमूटपणे सर्व पहात असतो. तो वृक्ष वाढला किंवा कुणी तोडला तरी त्या पर्वताला काहीही देणेघेणे नसते. त्याप्रमाणेच द्रष्टा हा प्रत्येक देहाचा साक्षी आहे. तो देहात असून विदेहीच असतो. म्हणून त्याला संसारबंधनाचा स्पर्शही होत नाही परंतु हे रहस्य न जाणल्याने अविवेकी लोक ह्या जगामध्ये अगदी जखडून पडले आहेत. जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत असतो. कर्म सात्त्विक असो, राजस असो वा तामस असो त्याचे फळ हे मिळणारच आणि ते भोगण्यासाठी पुनर्जन्म मिळणारच हे उघड सत्य आहे. सात्त्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी, देव योनींमध्ये, राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य असुर योनींमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूतप्रेत, पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये मनुष्य जन्म घेत असतो. स्वप्नातील सुखापभोग असतात ते ज्याप्रमाणे आपण स्वप्नामध्ये खरेच मानतो, त्याप्रमाणे संसार हे एक दीर्घ स्वप्नच आहे, म्हणून ते मिथ्या व केवळ मायिक होय. जागे झाले म्हणजे स्वप्न खोटे आहे हे लक्षात येते, त्याप्रमाणे ज्याचा अहंकार नष्ट झालेला आहे त्याच्या दृष्टीने संसारही मिथ्याच आहे. उद्धवा! हीच काय ती ब्रह्मज्ञानातील मुख्य गोष्ट आहे हे लक्षात ठेव. ह्यावरून उद्धवा! तू आता कदाचित् असे म्हणशील की, हे तुझ्या तोंडचे भाषण ऐकून संसार हा सर्व मिथ्याच आहे असे दिसते, मग साधन करावयाच्या भरीला तरी का पडावे?
संसारबंधनच जर मुळी मिथ्या आहे, तर मग श्रवण, मनन, चिंतन, विवेक, वैराग्य, ध्यान यांचा खटाटोप तरी लोक व्यर्थ का करतात. हा सगळय़ांनाच पडणारा प्रश्न भगवंतांच्याच तोंडातून ऐकून उद्धवाला विस्मय वाटला आणि या प्रश्नाचे उत्तर भगवंतांकडून ऐकण्याची त्याची उत्सुकता अधिकच वाढली.
क्रमशः