लोंढा-खानापूर रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी /खानापूर
लोंढा-खानापूर रेल्वे दुपदरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील शेडेगाळी रेल्वेगेटजवळ भुयारी पूल बांधण्याच्यादृष्टीने अद्याप कोणत्याच हालचाली नाहीत. यामुळे शेडेगाळी गेटजवळ भुयारी पूल होणार की नाही? पूल न झाल्यास या मार्गावरील वाहतुकीची समस्या रेल्वे खाते कशी मार्गी लावणार, याबद्दल जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लोंढा-खानापूर रेल्वेमार्ग दुपदरी करत असतानाच या मार्गावर बहुतेक रेल्वे फाटकांजवळ भुयारी पूल बांधून समस्या दूर केली आहे. पण खानापूर-हेम्माडगा मार्गावरील शेडेगाळी गेटजवळ भुयारी पुलाबाबत रेल्वे खात्याकडून कोणत्याच हालचाली नाहीत. वास्तविक खानापूर-हेम्माडगा-अनमोड राज्यमार्ग आहे. यामुळे बेळगाव-गोवा अंतर येता-जाता मिळून 36 कि. मी. ने कमी होते. सदर मार्गावर लहान-मोठय़ा प्रवासी वाहनांची बरीच वर्दळ असते. शेडेगाळी रेल्वेगेटजवळ एखादी रेल्वे आली की फाटक बंद केले जाते. यामुळे वाहनांना प्रतीक्षा करत थांबावे लागते. गोव्याला जाणारा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
दुपदरी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यावर लोंढा-मिरज मार्गावर येणाऱया जाणाऱया रेल्वेंची संख्याही वाढणार आहे. यामुळे कुठल्याही परिस्थितीत दुपदरी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होत असतानाच खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील शेडेगाळी रेल्वेगेटजवळ भुयारी पुलाचे काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
खानापूर, हेम्माडगा, अनमोड मार्गात तालुक्याच्या पश्चिम भागातील जवळपास 30 खेडी येतात. जोयडा तालुक्यातीलही काही खेडय़ांतील जनतेला खानापूर, बेळगावला जाण्यासाठी हाच सोयीचा मार्ग आहे. यामुळे रेल्वे विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेडेगाळी रेल्वेगेटजवळ भुयारी पुलाची सोय करून या मार्गावरून निरंतर वाहतूक सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली
आहे.
लोंढा-खानापूर रेल्वेमार्गाचा विचार करता गुंजी, शिरोली रस्त्यावरील संगरगाळीजवळील रेल्वेफाटक असो, किंवा खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटरजवळील रेल्वे मार्गावर यापूर्वीच भुयारी पुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. असोगा मार्गाजवळील रेल्वे फाटकाजवळही भुयारी पूल मंजूर झाला आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. यामुळे असोगा रस्त्यावरील भुयारी रेल्वेपुलाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
अशा पद्धतीने शेडेगाळी रेल्वेगेटजवळील भुयारी पुलाच्या कामालाही तात्काळ मंजुरी देऊन तो प्रश्न मार्गी लावावा, अशी मणतुर्गा, नेरसा, शिरोली ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गावांतील जनतेची मागणी आहे.